माई हरपली…

प्रेम, माया, जिव्हाळा, दातृत्व आणि मातृत्व याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे माई! या माईचे र्‍हदयाचे ठोके काल सकाळी थांबले आणि हालोंडी आणि गोमटेश परिवार पोरका झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही येणाऱ्या संकटांना तोंड देत कुटुंबाचा गाडा ओढत… अवघ्या हालोंडीची आपलीशी झालेली माई बेळगावच्या गोमटेश परिवाराची देखील प्रेमळ माई झाली होती! पूर्वी चुलीवर सकाळी ठेवलेले चहाचे पातेले दिवस वर आला तरी उकळतच असायचे… सकाळ पासूनच माणसांचा राबता घरात असायचा… हे माणसं जोडण्याचे संस्कार माईने मुलांच्यावर केले, म्हणूनच आज इतके मोठे साम्राज्य उभे राहीले.
माझे वडील आणि माई हे सख्खे भाऊ बहीण! मी लहान असताना रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात मला सख्खी बहीण नसल्याने, मी म्हणालो “मला कोण राखी बांधणार?” तेव्हापासून आजतागायत माईंनी नेहमी राखी बांधून माई, ताई आणि आत्ती अशी तिहेरी भूमीका निभावली. माझं लग्न… माझ्या मुलाचं संगोपन करणार्‍या माईंचा माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मायेचा उबदार स्पर्श होता… माझा मुलग्याच्या जन्मापासून सहा महिन्याचा तो होईपर्यंत त्यांनीच त्याची देखभाल केली. आज ही माझ्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
राजूदादाच्या अकाली जाण्याने सहनशीलतेची ही खंबीर मूर्ती ढासळली… हळूहळू तीची स्मृती निष्प्रभ होऊ लागली. हळूहळू कोणालाही ओळखेना… अशा काळात देखील, मी कोण म्हटले की… आण्णा! म्हणायच्या. गेली 7/8 वर्षे घरातल्या सर्वांनी, विशेषतः उषाताईने त्यांची सेवा केली. म्हणूनच नव्वदीचा टप्पा त्या पार करू शकल्या!
माजी आमदार संजय पाटील आणि दिलीप पाटील यांनी उभे केलेले साम्राज्य देखील त्यांच्या संस्काराचा आणि पुण्याईची शिदोरी आहे. चिखलात उगवलेल्या या ‘कुसुम’ ने अनेकांचे जीवन सुगंधित केले. आमच्या येणाऱ्या अनेक पिढ्या त्या सुगंधाचा लाभ घेत रहातील!
भावपूर्ण श्रद्धांजली!

प्रशांत उर्फ उदय पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *