पुष्पा पाटील/कोल्हापूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. पण त्यांनी राष्ट्रप्रेम, हिंदू धर्माभिमान सोडला नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे सावरकरांचे प्रेरणास्थान होते. आज राष्ट्रप्रेम जागृत ठेवण्यासाठी सावरकरांची प्रेरणा घेऊन नवतरुणांनी काम करायला हवे, असे प्रतिपादन थोर विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
कळंबा येथे आरिश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित व्याख्यानात धर्माधिकारी बोलत असताना म्हणाले, शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊनच सावरकरांनी आपली जडणघडण केली, आज भारत हा सर्वाधिक तरुणांचा देश आहे, 20 व्या शतकापूर्वी गावांमध्ये अनेक तालमी होत्या, घराघरात पैलवान होते, मात्र आजची स्थिती ही याच्या अगदी उलट असल्याचे दिसून येते. पुन्हा नव्याने भारत देश कणखर बनवण्याचे आवाहन धर्माधिकारी यांनी केले.
भारत देश पुन्हा कणखर बनवायचा असेल, तर आजच्या तरुणांनी व्यसनाधीनतेपासून लांब राहिले पाहिजे,तसेच राष्ट्रप्रेम व प्रामाणिकपणा सदैव उराशी बाळगला पाहिजे, असा सल्ला देखील अविनाश धर्माधिकारी यांनी उपस्थितांना दिला.
यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे संचालक अजित नरके व इतर मान्यवर उपस्थित होते.