जालना : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून लोकसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्याबरोबर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नियुक्त सर्व यंत्रणांनी दक्षपणे काम करावे. तसेच निवडणुका निर्भय व नि:पक्षपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.
लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आचारसंहिता व कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती संगीता सानप, जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, शशीकांत हादगल आदी उपस्थित होते.
श्री. बिनवडे म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात चार टप्प्यात मतदान होणार असून तिसऱ्या टप्प्यामध्ये जालना जिल्ह्यात मतदान होणार आहे. जालना जिल्ह्यात 6 मतदारसंघाचा समावेश असून यापैकी तीन मतदारसंघ औरंगाबाद जिल्ह्यातील असणार आहेत. अधिसुचना जारी करण्याची तारीख 28 मार्च असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 4 एप्रिल राहणार आहे. नामनिर्देशन पत्राची छाननीची तारीख 5 एप्रिल असून उमेदवारी मागे घेण्याची तारीख 8 एप्रिल असणार आहे. मतदानाची तारीख 23 एप्रिल, 2019 अशी असून मतमोजणी ही 23 मे रोजी होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
निवडणुकीच्या कामासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून नियुक्त अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेले काम चोखपणे पार पाडावे. सर्व अधिकाऱ्यांना कामाचा अहवाल सादर करण्यासाठी विहित नमुने देण्यात आले असून या नमुन्यांची तपासणी करुन घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवावा. निवडणुकीदरम्यान सातत्याने व्यस्त असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यादृष्टीने पोलीसांसाठी पोस्टल मतदान सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून याचा वापर करावा. निवडणुकीमध्ये आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी आयोगाकडून संगणकीय ॲप्लिकेशन उपलब्ध करुन देण्यात येणार असुन या अप्लीकेशनच्या माध्यमातुन विहित वेळेत नियमांची तपासणी करुन परवानग्या देण्याची कार्यवाही व्हावी. निवडणुकीच्या अनुषंगाने विविध भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून अवैध रोकड, मद्य वाहतुक यासारख्या बाबींना पायबंद करावा. दिव्यांगांना मतदानाचा हक्क बजावता यावा यादृष्टीने मतदान केंद्रावर सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आयोगाने निर्देश दिले असुन त्यादृष्टीने सर्व सुविधा दिव्यांगांना उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यातील खाजगी व शासकीय होर्डिंगवर असलेले बॅनर्स तातडीने हटविण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
एस. चैतन्य यांनीही पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या तयारीची माहिती सादर केली.