मुंबई प्रतिनिधी : जून ते ऑक्टोबर 2021 मधील अतिवृष्टी / पुरपरिस्थितीमुळे बाधीत झालेल्या शेती / फळपिकांकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा जास्त दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यात आल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य डॉ. परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री. वडेट्टीवार बोलत होते. गेल्या दोन वर्षात कोरोनाचे संकट असतानाही जिरायत पिकांसाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर, बाग पिकांसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर तर बहुवार्षिक फळपिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात आली आहे. राज्य शासन शेतक-यांच्या पाठीशी भक्कमपणे आहे. शेतक-यांना शक्य ती मदत राज्य शासनाकडून करण्यात येत असल्याचे श्री. वडेट्टीवार यांनी पुढे सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत. सुरेश धस यांनी भाग घेतला
