MUMBAI : डोंबिवली येथील एमआयडीसी मधील इंडो कंपनीत आग लागल्याची घटना घडली आहे. सध्या या ठिकाणी अनेक स्फोटांचे आवाजदेखील येत असल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या ५ ते ६ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये धाकधूक वाढली आहे. आग लागण्याचे नेमके कारण अजून समोर आलं नाही. तीन आठवड्यांपूर्वी डोंबिवलीमधील अंबर केमिकल कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला होता. त्या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 72 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. त्याच्या जखमा अजूनही भरल्या नसताना बुधवारी पुन्हा स्फोट झाला. स्फोटांच्या प्रचंड आवाजामुळे डोंबिवलीकरांचा काळजाचा ठोका चुकला. दूरपर्यंत धुरांचे लोट दिसून आले. तीन आठवड्यापूर्वीचे दृश्य पुन्हा ताजे झाले
बुधवारी सकाळी दहा वाजता आग लागली. त्यावेळी त्या परिसरात असलेल्या सर्व गाड्या जळून खाक झाल्या आहेत. मालदे आणि इंडो अमाईन्स या दोन कंपनीत आग लागून एकामागे एक स्फोटांचे आवाज आले. या आगीत कंपनीचे तीन प्लॅन्ट जळून खाक झाला आहे. हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे. त्याच परिसरात शाळा आहे. आगीची घटना समजताच शाळेला सुट्टी देण्यात आली. आग लागलेल्या कंपनीत कोणी होते की नाही? त्यासंदर्भात माहिती मिळाली नाही. आग कशामुळे लागली? त्याची माहिती मिळाली नाही.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिसतील महानगरपालिकेतून टँकर मागवण्यात आले आहे. कल्याण, बदलापूर, उल्हासनगरमधून अग्नीशनम दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. परंतु दोन तासानंतरही आगीवर नियंत्रण मिळाले नाही. डोंबिवलीमधील धोकादायक कंपन्या बंद कराव्या, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
डोंबिवली दुसऱ्यांदा आगीमुळे हादरली..
