जालना : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण बचावच्या मागणीसाठी आमरण बसलेल्या लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री या गावी उपोषणस्थाला भेट देऊन ओबीसी आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच यावेळी, प्रकाश आंबेडकर यांच्या विनंतीला मान देऊन ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी पाणी पिले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना, “आमची आधीपासूनच भूमिका आहे की, ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागता कामा नये,” असे म्हंटले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “एखादी व्यवस्था सेटल झाली असेल, तर अश्या शाश्वत झालेल्या व्यवस्थेत इतर कोणाला घुसडण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिकदृष्ट्या सलोखा बिघडला जातो. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचे ताट हे वेगळेच असले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर त्यांचे ताट वेगळे असले पाहिजे.”
ते पुढे म्हणाले,” मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचे ताट वेगळे हवे. दोघांना एकमेकांसमोर विधानसभेपर्यंत भिडवत राहतील, अशी माझी धारणा आहे. भाजप संविधान बदलेल या भीतीने संविधानाच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे जनतेचा कल महाविकास आघाडीकडे गेला. ओबीसींनी संविधानावरती विश्वास ठेवला. हा आरक्षण वाचवण्याचा सर्वात मोठा भाग असू शकतो,” असे ते म्हणाले