कोल्हापूर : तीन दिवसांपूर्वी विशाळगडावर दंगल होऊन मोठयाप्रमाणात नुकसान झाले. या शाहूनगरीत ज्या शाहूराजेंनी सर्व समाजाला समतेचा विचार दिला व साऱ्या देशांनी या विचाराचे स्वागत केले, त्याच जिल्हयात राज्य सरकार व विषेशतः भाजपा कोल्हापूरसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा वारंवार प्रयत्न करत आहे. ही दंगल पूर्वनियोजित होती यामध्ये राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन शामील होते असा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे.
लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपाला मोठा फटका बसल्यानंतर व आपल्याकडे पुन्हा विधानसभा काबीज करण्यासाठी जनतेसमोर मते मागण्यासाठी कोणताच मुददा नसल्याकारणाने असल्या प्रकारचे गलिच्छ राजकारण करून तरूणांची माथी भडकवून त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचे पाप भाजपा करीत आहे. विशाळगडसह राज्यातील सर्वच गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे निघालीच पाहिजेत यात कोणाचेही दुमत नाही. कोणताही वादविवाद न होता हे सरकार अतिक्रमणे काढू शकत होते, मग दंगल झाल्यानंतरच अतिक्रमणे काढण्याचे कारण काय? म्हणजे हे स्पष्ट होते की, हि दंगल पूर्वनियोजित होती यात कोणतीही शंका नाही. जिल्हाप्रशासन व जिल्हापोलीस प्रशासन यांचे फार मोठे अपयश असून निष्काळजीपणा आहे. संबंधीत विभागाचे डी. वाय. एस. पी व पोलीस निरीक्षक यांना निलंबीत करण्याबरोबरच जिल्हाधिकारी कोल्हापूर व जिल्हापोलीस प्रमुख कोल्हापूर यांची या गंभीर प्रकरणात निवृत्त न्यायाधीशमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. असे निवेदन शिवसेना उद्धव ठाकरे गट कोल्हापूर यांच्यावतीने विशेष पोलीस महानिरीक्षक यांना देण्यात आले.
यावेळी संजय पवार, विजय देवणे, संजय चौगुले, सुजित मिणचेकर,वैभव उगळे,सुनील शिंत्रे,रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे, संदीप दबडे, प्रतिगण्या उतुरे, स्मिता सावंत, पूनम फडतरे, प्रेरणा बाकले, सागर साळोखे, शोनक भिडे, भरत आमते, आशुतोष इनामदार, राजेंद्र पाटील, सुरेश चौगुले, संभाजी भोकरे,अर्जुन संकपाळ, रीमा देशपांडे,उल्हास पाटील,पल्लवी चिखलीकर, किरण पडवळ, हर्षल पाटील, अवधूत साळोखे, पोपट दांगट, राहुल गिरोले, सुरेश पोवार, सतीश पाणारी, आप्पासाहेब इंजुळकर,संभाजी पाटील, विनोद खोत आदी लोक उपस्थित होते