कोल्हापूर: गजापूर येथे घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर समाजात सलोखा राहावा यासाठी आज इंडिया आघाडीच्या वतीने शिव-शाहू सद्भावना रॅलीचे अयोजन करण्यात आले. समाजात सलोखा राहावा यासाठी काढलेल्या यात्रेत मोठया संख्येने सहभाग होत नागरिकांनी सामाजिक एकोप्यावरील विश्वास आणखी दृढ केला. समता आणि बंधुत्वारील विश्वास आणखी दृढ केला. इंडिया आघाडीतर्फे या रॅलीचे आयोजन केले होते. नर्सरी बाग येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळापासून सायंकाळी पाच वाजता सद्भावना यात्रा निघाली.
राजर्षी छत्रपती महाराज यांच्या समतेच्या संदेशावरील कोल्हापूरकरांचा विश्र्वास यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, युवराज मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार सत्यजित पाटील आदी यात्रेच्या अग्रभागी होते. क्रांतिवीर चिमासाहेब महाराज चौक, सीपीआर चौक मार्गे यात्रा भाऊसिंगजी रोडवरुन मार्गस्थ झाली. महापालिका मार्गे सद्भावना यात्रा छत्रपती शिवाजी चौकात पोहोचली. कोणत्याही प्रकारची घोषणा न देता मूकपणे यात्रा काढण्यात आली. राष्ट्रगीताने या रॅलीची सांगता झाली.
या रॅलीमध्ये शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, ए. वाय. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, माजी महापौर आर.के. पोवार, अॅड. महादेवराव आडगुळे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर,मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, रामराजे कुपेकर, सतीशचंद्र कांबळे, गिरीश फोंडे यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.