कोल्हापूर/प्रतिनिधी: कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणीक नुकसान झाले होते. ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा विचारात घेता इंग्लिश मिडीयम असोशियशन तथा इम्साने उद्या सोमवारपासून शाळा सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी शाळा बंदचे आवाहन केल्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळाही बंद ठेवून आवाहनला प्रतिसाद देणार असल्याची माहिती इम्साचे अध्यक्ष गणेश नायकूडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गणेश नायकूडे म्हणाले, मागील दोन वर्षाच्या लॉकडाऊन मध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, शारीरिक, मानसिक व बौद्धिक नुकसान झाले आहे. डिसेंबर २०२१ मध्ये शाळा सुरू झाल्यानंतर मुलांना शाळेत आणणे, त्यांना शाळेत बसवणे हे अतिशय अवघड झाले होते. तथापि शिक्षक व मुख्याध्यापक यांनी अतिशय जिकिरीने विद्यार्थ्यांना शाळेमध्ये ‘येऊ’ केला आहे. पण पुन्हा लॉकडाऊनमुळे शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्यापासून रोखून ठेवले. यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शासनाने ऑनलाइन शाळेचा पर्याय सुचवला आहे. पण ऑनलाइन शिक्षण सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त झालेले नाही व त्याचे अनेक दुष्परिणाम समोर आलेले आहेत. यामुळे शाळा सुरू करण्यासाठी पालकांचा व विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून कोल्हापूर जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा १७जानेवारीपासून सुरू करीत असल्याचा निर्धार व्यक्त केला होता.
ते म्हणाले, ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी शाळा सुरु करणे बाबत संयम बाळगण्याचा सल्ला सर्व संस्थाचालकांना दिला. संघटनेने सुद्धा याबाबतीत एकूण राज्यभरातली परिस्थिती लक्षात घेऊन, जबाबदारीची जाणीव ठेवून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय हा जिल्ह्यापुरता मर्यादित नसून शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून परवानगी मिळवणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची शिष्टमंडळासह भेट घेण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान मा शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या परिपत्रकानुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये समूह अध्यापन, गृहभेटी व ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात ठेवण्यात येणार असल्याचे ठरविले आहे. पत्रकार परिषदेला संस्थापक महेश पोळ, के. डी. पाटील, एन. एन. काझी, नितीन पाटील, विल्सन वासकर, माणिक पाटील, सचिन नाईक,शहराध्यक्ष अमर सरनाईक, चंद्रकांत पाटील, किरण माळी, मोहनराव माने, पी.आय.बोटे व संस्थाचालक उपस्थित होते.
____________________ जाहिरात___________________