मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – पुणे- मुंबई महामार्गावरील भूमकर चौक या ठिकाणीच्या रस्त्यावर सोमवारी (दि. ६) संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास भरपूर प्रमाणात ऑइल गळती झाली होती. त्यावरून जवळपास तीस ते पस्तीस वाहनचालक घसरून चालक जखमी झाले होते. यावेळी वेळीच थेरगाव सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी धाव घेऊन मदत कार्य केल्यामुळे पुढील अनर्थ टाळला, असे सूत्रांनी सांगितले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना अभिजीत जाधव यांनी सांगितले की, सोमवारी (दि. ६) संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास ते तेथून जात होते. त्यांनी पहिले की, भुमकर चौक या ठिकाणीच्या रस्त्यावर ऑइल गळती झाली होती. त्यांनी घडलेला प्रकार थेरगाव सोशल फाउंडेशन यांना दूरध्वनी करून सांगितला. त्यानंतर त्वरित त्या ठिकाणी सोशल फाउंडेशनचे अनिकेत प्रभु, राहुल सरवदे, राहुल जाधव, अंकुश कुदळे, श्रीकांत धावारे, अभिजीत जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशामक दलाला या घटनेची माहिती कळवली. त्यांना त्या ठिकाणी पाचारण केले. अग्निशामक दलाचे वाहन येण्यापूर्वी थेरगाव सोशल फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून वाहतूक वळवली. त्या ठिकाणी कोणताही अपघात होणार नाही, याची दक्षता घेऊन त्याठिकाणी उपलब्ध असलेले वाहतूक पोलीस यांची देखील खूप मदत झाली. त्यानंतर अग्निशामक दलाने पूर्ण रस्ता धुऊन काढला आणि वाहतूक पूर्ववत केली, असे जाधव यांनी सांगितले.