Getting your Trinity Audio player ready...
|
उपसंपादक: प्रकाश कांबळे
पुणे बेंगलोर महामार्गातील चौपदरीकरणातील त्रुटींमुळे व सदोष ड्रेनेज व्यवस्थेमुळे वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथील उड्डाणपुलाला पावसाळ्यात तलावाचे रूप प्राप्त झाले आहे. पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी पसरली आहे तर डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे वाहनधारकांना अक्षरशः घाणीतून प्रवास करावा लागत असून रस्ते विकास प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे वाठार उड्डाण पुलाखालील प्रवेशद्वाराला विद्रुपीकरणाची कळा प्राप्त झाली आहे . दरम्यान वाठार ग्रामस्थांनी सांडपाणी निर्गतीप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग व सांगली -रत्नागिरी मार्गावरील वाठार तर्फ वडगाव येथील उड्डाणपूल परिसर महत्वपूर्ण असून राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासी वाहने पुणे व कोल्हापूरच्या दिशेने जाताना उड्डानपुल चौक येथे थांबतात.त्यामुळे या चौकात सतत मोठी गर्दी असते.
राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणादरम्यान नाले ,ओढे मुजविल्यामुळे नैसर्गिक प्रवाह बंद झाले आहेत. सदोष ड्रेनेज व्यवस्थेमुळे पाणी प्रवाहित होत नाही. पावसाळ्यात पाणी उड्डाण पुलाखालील चौकात साचुन तलावाचे रूप प्राप्त झाले आहे. पाणी अनेकदिवस साचून राहिल्याने दुर्गंधी पसरली आहे त्यातूनच वाहनधारकांना प्रवास करावा लागत आहे. डासांची उत्पत्ती वाढून साथीचे रोग पसरत आहे. महामार्गशेजारील व बसस्थानक परिसरातील नाले रस्ते विकास कडून सफाई अभावी नाले कचऱ्यानेच भरलेले आहेत त्यातून नाक मुठीत धरून बसस्थानकामध्ये थांबण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. एकंदरीत वाठार उड्डाणपूल परिसराला अवकळा प्राप्त झाली आहे. वाठार ग्रामपंचायतीने वारंवार सूचना करून दखल घेतली जात नाही. दरम्यान आज वाठार ग्रामस्थांनी पाणी निर्गतीप्रश्नी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे .यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप चौगुले , संतोष वाठारकर, बाळासो चौगुले, शकील मुजावर ,दादासो वाकसे अतिक पोवाळे, संभाजी वाकसे, गणेश कांबळे, सागर कांबळे, गोविंद गायकवाड यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते