स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन स्पर्धेत उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडूचे संघ विजेते

विशेष वृत्त अजय शिंगे

कोल्हापूर : केआयटीचे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर, भारतीय शिक्षण मंत्रालय, इनोव्हेशन सेल आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन स्पर्धेत रेवा इंजिनिअरिंग कॉलेज, रेवा (मध्यप्रदेश), अमिटी विद्यापीठ नोएडा (उत्तरप्रदेश), पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (महाराष्ट्र), अमृता स्कुल ऑफ इंजिनिअरिंग करुणापल्ली (तामिळनाडू)या चार संघांनी बाजी मारत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस एआयसीटीईकडून देण्यात आले.

२५ व २६ ऑगस्ट आशा दोन दिवशी सलग ३६ तास चाललेल्या या स्पर्धेत १५ राज्यांतील, २६ संघांमधून जवळपास २५० विद्यार्थी सहभागी झाले होते.या सर्व स्पर्धकांना ग्रामीण विकास मंत्रालय व उद्योगविश्वातून पुढील सहा समस्यांची उकल करण्याचे आव्हान देण्यात आले होते.

१) गुणवत्तेचा दर्जा कमी न होउ देता एखाद्या फोटोचे किंवा दस्तऐवजाचे आकारमान कमी अधिक करण्यासाठी प्रणाली विकसित करणे. २) प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बांधलेल्या घरांचे मुल्यमापन अथवा देखरेख करण्यासाठी माहीत व संप्रेषण तंत्रज्ञानाधिष्ठित प्रणाली विकसित करणे. ३) समूह स्तरावर आर्थिक बदलांचे विश्लेषण आदान – प्रदान पद्धतीचा सिद्धांत वापरून स्थानिक आर्थिक योजनांसाठी सांकेतिक स्तर प्रणाली विकसित करणे ४) हस्तलिखित माहिती ओळखून त्याचे विश्लेषण करून सुधरण्या योग्य माहितीमध्ये परावर्तित करणारी प्रणाली विकसित करणे. ५) गणितीय पद्धतीचा वापर करून स्थानिक भाषांचे हिंदी किंवा इंग्रजी भाषेत सुलभ भाषांतर करणारी प्रणाली विकसित करणे. ६) स्थानिक पातळीवर बोलली जाणारी भाषा ओळखणे व समजून घेण्याच्या दृष्टीने प्रणाली विकसित करणे. 

 तत्पूर्वी या स्पर्धेच्या समारोप व बक्षीस वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम्सचे मनुष्यबळ उपाध्यक्ष मा. गजानन मोरे यांनी स्पर्धकांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या मनोगतात इंडस्ट्री ४.० चे महत्व सांगून उद्योग क्षेत्रात येत असलेल्या क्रांतीचा अभ्यास करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. तसेच येत्या काळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी मन, मेंदू आणि मनगट सक्षम ठेऊन शिस्तबद्ध वाटचाल करण्याचा सल्ला दिला. ते काम करत असलेल्या टाटा ग्रुपमध्ये एखादा अभियंता किंवा कर्मचारी घेत असताना त्यानी वापरत असलेल्या मापदंडाची माहिती देऊन सध्याच्या कंपन्या अभियंत्याकडून ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन यांची अपेक्षा करतात त्यामुळे या गोष्टी मुलांनी अंगी बाणविणे गरजेचे असल्याचे सांगितले. 

अध्यक्षस्थानी केआयटीचे अध्यक्ष मा. सुनिल कुलकर्णी होते तर उपाध्यक्ष साजिद हुदली व सचिव दिपक चौगुले यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. आपल्या अध्यक्षीय मनोगतात श्री कुलकर्णी यांनी केआयटीच्या ४० वर्षांच्या गुणवत्तापूर्ण परंपरेचा आढावा घेऊन या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा म्हणून या हॅकॅथॉन स्पर्धेकडे बघता येईल असे सांगितले. अशा स्पार्धांचे आयोजन करण्यासाठी केआयटी नेहमी तत्पर आणि उत्साह दाखवेल असेही संगीतले.

यावेळी स्पर्धेचे प्रायोजक मा. चंद्रशेखर डोली, व बिपीन जिरगे यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेचे कार्यकारी संचालक विलास कार्जीन्नी यांनी स्पर्धेचा अहवाल मांडला. स्पर्धेच्या परीक्षकांनी व सहभागी स्पर्धकांनी आपले अभिप्राय मनोगतांमधून व्यक्त करत केआयटीच्या नेटक्या संयोजनाचे कौतुक केले. स्पर्धेचे शासकीय केंद्रप्रमुख म्हणून प्रसाद दिवाण तर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे प्रतिनिधी म्हणून मंजित राणा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संयोजक प्रा. अजित पाटील यांनी आभारप्रदर्शन तर सूत्रसंचालन क्षितिजा ताशी यांनी केले. यावेळी केआयटीचे सल्लागार डॉ. मोहन वणरोट्टी, समन्वयक प्रा. अजय कापसे, प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगीताने स्पर्धेचा समारोप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *