कोल्हापूर : होप फाउंडेशनने २५ क्षयरुग्णांना घेतले सहा महिन्यासाठी दत्तक. होप फाउंडेशन,गडहिंग्लज यांच्यामार्फत सामाजिक जाणीवेतुन २५ क्षयरुग्ण दत्तक घेतले.होप फाउंडेशनची सामाजिक चळवळ समाजाला विधायक दिशा देणारी आहे. एच.आय.व्ही. बाधित मुले व विविध आरोग्य विषयक मदत देण्यास होप फाउंडेशन सदैव पुढे असते. क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांनी समाजासमोर चांगला पायंडा पाडला आहे. असे गौरवउद्गार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा जी.कुंभार यांनी काढले. त्या गडहिंग्लज येथे होप फाउंडेशनद्वारे आयोजित क्षयरुग्णांना पोषण कीट वाटप कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलत होत्या. यावेळी डॉ. उषा जी.कुंभार व नचिकेत भाद्रापूर,शकील जमादार,अल्ताफ नदाफ यांच्या हस्ते २५ क्षयरुग्णांना पोषण आहर किट आहार वाटप करण्यात आले.
यावेळी त्यांनी निक्षय मित्र बाबत सविस्तर माहिती दिली. बोलताना पढे त्या म्हणाल्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारताच्या उद्दीष्ट्यपूर्तीसाठी राष्ट्रपतींनी ९ सप्टेंबरला प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ केला आहे. या योजनेअंतर्गत संस्था, उद्योग समुह, व्यक्ती, (निक्षय मित्र) यांनी आपल्या तालुक्यातील किंवा कार्यक्षेत्रातील क्षयरुग्णांना पोषण आहार देऊन किमान सहा महिने ते २ वर्षा पर्यत दत्तक घेवून सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले होते या अह्वानास समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
होप फाउंडेशन चे सामाजिक, आरोग्य विषयक कामकाज व एच.आय.व्ही. बाधित मुलांसाठीचे कार्य पाहता प्रोत्साहनपर ५ हजार रुपये ची मदत जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.उषा जी कुंभार यांनी त्वरित होप फाउंडेशनला केली.
होप फाउंडेशनचे श्री.नचिकेत भाद्रापूर, आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले होप ही विद्यार्थी निर्मित संस्था आहे ज्याने ११ वर्षाचा सामाजिक प्रवास आज पूर्ण केले आहे. या संस्थेबद्दलची रंजक गोष्ट म्हणजे होपच्या या तरुणांनी इयत्ता ६वी मध्ये सामाजिक प्रवासाला सुरुवात केली. आज ही संस्था 150 एचआयव्ही अनाथ मुले, झोपडपट्टीतील मुले,अपंग मुले, वृद्ध विधवा महिला यांसारख्या शेकडो गरजूंना आशेचे किरण बनले आहे.पर्यावरण, सरकारी शाळा दत्तक घेणे, शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करणे, संस्कृतीचे संवर्धन करणे असे इतर असंख्य प्रभावकारी कार्य या संस्थेद्वारे आज होत आहे आणि म्हणूनच आम्हाला आपल्या ‘होप’चा अभिमान आहे. हि मदत मिळविण्यासाठी विश्वास डूबल, नामदेव सावंत यांनी विशेष प्रयत्न केले. सूत्रसंचालन नामदेव सावंत यांनी केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ . गीता कोरे , डॉ.पाटील,होप फाउंडेशनचे नचिकेत भाद्रापूर,शकील जमादार,अल्ताफ नदाफ उपस्थित होते. तसेच एकनाथ पाटील, विश्वास डूबल, नामदेव सावंत, अजित ससाने, व कर्मचारी उपस्थित होते.
निक्षय मित्र बनण्यासाठी नोंदणी कशी करावी ?
प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानामध्ये स्वेच्छेने निक्षय मित्र बनण्यासाठी https://tbcindia.gov.in/ या निक्षय पोर्टलवर निक्षय मित्राचे पूर्ण नाव, संस्थेचा प्रकार, मोबाईल नंबर,इमेल आयडी, पत्ता, कोणती मदत करणार आहे,किती वर्षासाठी मदत करणार आहे, व कोणत्या तालुक्यासाठी मदत करणार आहे हि माहिती भरून संस्थाचे/व्यक्तीचे रजिस्ट्रेशन करावे. अथवा उपक्रमात सहभाग नोंदविण्यासाठी जिल्हा क्षयरोग अधिकारी,कोल्हापुर कार्यालयास प्रत्यक्ष भेट देवून अथवा dtomhklp@rntcp.org या ई-मेल आयडीद्वारे निक्षयमित्र म्हणून संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा जी.कुंभार यांनी यावेळी केले.