कोल्हापूर : आपली अनेक वर्षांची परंपरा कायम राखत अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ च्या पहिल्या फेरीमध्ये खाजगी व स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये केआयटीच्या अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दीली आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयामध्ये रिपोर्टिंग आजपासून सुरू झाले. काल सायंकाळी संचालक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालय यांच्याकडून प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या पहिल्या प्रवेश फेरीची अधिकृत यादी जाहीर केली. यामध्ये स्वयंअर्थसहाय्यीत व स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये केआयटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिल्याचे आढळून आले. रिपोर्टींग सुरु झाल्यानंतर प्रवेश घेण्यासाठी आज महाविद्यालयामध्ये पालक व विद्यार्थी यांनी गर्दी केली. या वर्षीचा पहिला प्रवेश घेतलेल्या संगमनेर अहमदनगर सागर सखाराम पुरी( सिव्हिल व एन्व्हार्यमेंटल) व कोल्हापूर येथील कु. रिया ओसवाल या विद्यार्थ्यांचे व त्याच्या पालकांचे केआयटीचे कार्यकारी संचालक डॉ. विलास कार्जिन्नी व सल्लागार डॉ. मोहन वणरोटी यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रवेश घेण्यासाठी संबंध महाराष्ट्रातून आलेल्या विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.
१९८३ सालापासून केआयटीने गुणवत्ता आणि सातत्य या गुणांवर अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. नॅक मानांकन, एनबीए मानांकन, डिजिटल परीक्षा यंत्रणा, बीटेक ओनर्स कोर्सेस, मयुरा एआयसीटीई आयडिया लॅब, उत्कृष्ट कॅम्पस सुविधा, प्रसिद्ध कंपन्यांशी सामंजस्य करार, एनसीसी मिळालेले जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय, एआर-व्हीआर लॅब, अशा एक ना अनेक गोष्टींमुळे केआयटी नेहमीच सर्वच स्तरावर अग्रेसर राहिले आहे. केआयटीला मिळालेल्या सर्वाधिक पसंतीमुळे केआयटी वरील पालकांचा विश्वास, विद्यार्थ्यांचे कौशल्य व केआयटीची गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या वेळी केआयटीचे कार्यकारी संचालक डॉ. विलास कार्जिन्नी व सल्लागार डॉ. मोहन वणरोटी , प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. डी. जे. साठे, डॉ. अक्षय थोरवत, प्रवेश प्रक्रिया समन्वयक डॉ. महेश शिंदे, प्रा. सौरभ जोशी, प्रा. अमर टिकोळे उपस्थित होते. केआयआयटीच्या या यशाबद्दल व गुणवत्तेची परंपरा कायम ठेवल्याबद्दल अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले व विश्वस्त यांनी पालक व विद्यार्थी यांच्या केआयटीवरील विश्वासाबद्दल आभार व समाधान व्यक्त केले.