अजय शिंगे /कोल्हापूर : लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल आता स्पष्ट झाला असून महाराष्ट्रात महाविकास आघाडीने चांगले यश प्राप्त झाले असून महायुतीला मात्र अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळवता आल्या आहेत.त्यामुळे हे सिद्ध झाले कि महाराष्ट्र हा महाविकास आघाडी सोबत आहे.
महाविकास आघाडीने या निवडणुकीत घवघवीत यश मिळवले असून त्यांनी ३० जागा आपल्या नावे केल्या आहेत. तर दुसरीकडे महायुतीला १७ जागांवरच समाधान मानावे लागले .काँग्रेस हा महाराष्ट्रात सर्वाधिक मोठा पक्ष ठरला असून काँग्रेसने १३ जागा जिंकल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाला ९ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ८ जागा जिंकता आल्या. भाजपला ९ जागा मिळाल्या असून शिवसेना शिंदे गटाला ७ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ एका जागा निवडून आणता अली.
यावेळीची राज्याची लोकसभा निवडणूक फार वेगळी ठरली, ती फक्त महाराष्ट्रातील राजकीय भूकंपांमुळे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मोठ्या पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण झाले. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर होणारी ही सगळ्यात मोठी निवडणूक होती त्यामुळे पक्ष कुणाचा त्यापासून सुरु झालेली हि लढाई चांगलीच चुरशीची झाली. लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळाली. शिवसेनेतील फुटीमुळे ही लढत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंसाठी प्रतिष्ठेची ठरली होती.महायुतीकडून भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यांनी निवडणूक लढवली होती. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे मुख्य घटक पक्ष होते. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत होती. मात्र त्यांचा या निवडणुकीत फारसा प्रभाव पडलेला दिसून आला नाही.
या लोकसभा निवडणुकीतून कॉंग्रेसनं महाराष्ट्रात जोरदार कमबॅक केलं आहे. तसा महाराष्ट्र हा पारंपारिकदृष्ट्या कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असे. मात्र मागील दोन लोकसभा निवडणुकांपासून भाजप आणि एनडीएनं इथं मुसंडी मारली होती.इतकी की 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 41 जागांवर विजय मिळाला होता. यातील 23 भाजपाच्या तर 18 शिवसेनेच्या होत्या. त्याउलट राष्ट्रवादी कॉंग्रेसला 4 आणि कॉंग्रेसला फक्त एकाच जागेवर विजय मिळवता आला होता.