कोल्हापुरात मान्सूनचा पहिलाच फटका;

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून कोकणाला जोडणाऱ्या पर्यायी मार्ग असणाऱ्या अनुस्कुरा घाटामध्ये जूनच्या दुसऱ्याच आठवड्यात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. अजून पावसाने इतका जोर धरला नाही, तरीदेखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये दरड कोसळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेऊन वाहतूक करणे गरजेचे आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या राजापूर तालुक्यातील अनुस्कुरा घाटात काल सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान दरड कोसळल्याने तेथील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे तेथील रस्ता 15 तासाहून अधिक काळ बंद असल्याने त्या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली असून दरड कोसळल्याने वाहतूक व्यवस्थेत अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सायंकाळच्या दरम्यान घाटातील रस्त्यात कोसळलेली दरड आणि माती काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे अनुस्कुरा घाटासारख्या इतर अन्य धोकादायक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाहणी व्हावी, तसेच त्या ठिकाणी पूर्व खबरदारी घेण्यात यावी.

एकंदरीत आता घाटातील सुरक्षित प्रवासासह घाटाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही प्राथमिक दृष्ट्या महत्त्वाचा ठरत असल्याचे दिसते. मान्सूनला नुकतीच सुरुवात झाली आहे आणि अशा घटना घडत असल्याने आसपासच्या परिसरातील नागरिकांना वाहतुकीसाठी मोठी अडचण भविष्यकाळात निर्माण होऊ शकते, त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात प्रत्येकाने अधिक खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. मागील 24 तासात राजापूर तालुक्यात जोरदार पाऊस असल्याने सायंकाळी उशिरा अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याची ही घटना घडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *