मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसकडून शुक्रवार, २१ जून रोजी राज्यभर राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यमध्ये वाढत असणारी बेरोजगारी, महागाई, NEET परिक्षेतील घोटाळा, खते-बियाण्यांचा काळाबाजार, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महायुती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलं आहे. तसेच, राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष २१ जून रोजी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी सकाळी अकरा वाजता सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून ‘चिखल फेको’ आंदोलन करून भाजपाप्रणित सरकारचा निषेध करणार आहे.
“राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरूण, गरिब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे. मागील १० वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातली आहे. सरकारी नोकर भरती केली जात नाही. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत, ह्या परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागते, शेतकरी संकटात आहे पण त्यांना मदत दिली जात नाही.
या आंदोलनात जिल्ह्यातील प्रमुख नेते, माजी मंत्री, खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, सेवादल, इंटक, सेल व विभाग यांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन भाजप सरकारचा निषेध करणार आहेत.