आमदार प्रकाश आवाडेनी माहिती न घेता सनसनाटी वक्तव्ये टाळावीत: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

कागल/ प्रतिनिधी दि.१३:
आमदार प्रकाश आवाडे यांचा कागलबद्दल प्रचंड गैरसमज निर्माण झाला आहे. कोणतीही माहिती न घेता ते करत असलेली सनसनाटी वक्तव्ये टाळावीत, असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.

कोरोना लसीकरण हातकणंगलेपेक्षा कागलला जास्त झाले आहे, असे वक्तव्य करुन श्री.आवाडे यांनी मुश्रीफांना लक्ष्य केले होते.
कागलमध्ये डी.आर.माने महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत मंत्री श्री.मुश्रीफ बोलत होते.

पुढे बोलताना श्री. मुश्रीफ म्हणाले, हातकणंगले तालुक्यात पहिला डोस एक लाख, ७७ हजार, ५६५ व दुसरा डोस ४४ हजार, ७२८ इतके लसीकरण पूर्ण झाले आहे. कागल तालुक्यात पहिला डोस ७० हजार ९९१ व दुसरा डोस १२,५५७ इतके लसीकरण पूर्ण झाले आहे.

श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, पॉझिटिव्हिटी रेट १५ टक्के हा राज्याच्या व देशाच्या तुलनेत जास्तच आहे. त्यामुळेच मृत्यूमध्ये कोल्हापूर जिल्हा एक नंबरवर आहे‌. हॉटस्पॉट म्हणून घोषित गावांवर लक्ष केंद्रित करा. तिथे चाचण्यांसह सर्वेक्षण आणि उपचार मोहीमही जोरात राबवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. दोन महिन्यांचे मोफत धान्य वाटप पूर्ण होत आले असून सर्वच पेन्शनधारकांना दोन महिन्याची पेन्शन ॲडव्हान्स वाटप करण्याचे काम सुरू आहे. शेतीसाठी खते, बी-बियाणे व औषध पुरवठाही कमी पडणार नाही, असेही ते म्हणाले.

“जिल्हा रुग्णालय कोल्हापुरातच राहील”

श्री. मुश्रीफ म्हणाले, आमदार श्री. आवाडे दुसरा एक दावा करीत आहेत, की सीपीआरचे मेडिकल कॉलेज झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा दर्जा रद्द झालेला आहे. तसेच आयजीएमचा दर्जा दुसरीकडे म्हणजेच गडहिग्लजला देण्याचा माझा प्रयत्न आहे. जिल्हा रुग्णालय व मेडिकल कॉलेज हे वेगवेगळे आहेत. जिल्ह्याचे रुग्णालय हे जिल्ह्यातच असतं तर मेडिकल कॉलेज शेंडा पार्कमध्ये होणार आहे. त्याचे कामही सुरू आहे. दरम्यान; सर्व सुविधांसह आयजीएमची बेड क्षमता ५०० करण्याचे उद्दिष्ट मी, पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ठरविले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय दुसरीकडे कुठेही, कुणीही नेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तसे होऊ देणार नाही.

“यंत्रमाग कामगारांचे महामंडळ”

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या काळात मंत्रालयात बैठका घेता येत नाहीत. कोरोणाचे हे निर्बंध उठल्यानंतर कामगार मंत्री म्हणून यंत्रमाग कामगारांचे महामंडळ स्थापन करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

या आढावा बैठकीला जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गट विकास अधिकारी सुशील संसारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी.व्ही.शिंदे, कागलचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे, कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता पाटील, गटशिक्षणाधिकारी डाॅ. जी. बी. कमळकर, कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडित पाटील, डॉ.अभिजित शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *