Shriharikota :…. अखेर भारताचे ‘चांद्रयान – २’ यशस्वीरीत्या अवकाशात झेपावले

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) –  भारताचे ऐतिहासिक ‘चांद्रयान 2’चे आज यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले. हेलियमच्या टाकीतील दाब कमी झाल्याने 15 जुलै रोजी उड्डाणाच्या 56 मिनिटे आधी ही मोहीम रद्द करण्यात आली होती. आता सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून आज दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी चेन्नईपासून 100 किमीवर असलेल्या सतीश धवन अवकाश केंद्राच्या दुसऱ्या क्रमांकाच्या प्रक्षेपण तळावरून चांद्रयान 2 अवकाशामध्ये झेपावले. सगळ्याच भारतीयांसाठी अभिमानाची असणारी ही मोहीम आहे.

‘चांद्रयान 2’ हे इस्त्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी चांद्रयान २ चं यशस्वी प्रक्षेपण केले. प्रक्षेपण झाल्यानंतर सगळ्यांनीच टाळ्या वाजवून आनंद साजरा केला. चांद्रयान २ या यानाचा हा सुरुवातीचा काळ आहे.

चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवून चंद्राच्या आजवर अभ्यास न झालेल्या दक्षिण ध्रृवाजवळील भागाचा अभ्यास करण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट असणार आहे. या उड्डाणाची उलटगणती रविवारी (दि. 21) 6 वाजून 43 मिनिटांनी सुरू करण्यात आली.

सौजन्य : डीडी न्यूज आणि इसरो

उड्डाणानंतर मोहिमेचे 15 टप्पे असून त्यात 45 दिवसांच्या काळात हे यान चंद्राच्या कक्षेत जाईल. शेवटच्या 15 मिनिटांत ‘चांद्रयान-2’ तेथील दक्षिण ध्रुवावर घिरटय़ा घालत राहील व नंतर रोव्हरसह तेथे अलगद उतरणार आहे.

चंद्रापासून सुमारे 30किलोमीटर अंतर राहिल्यानंतर ‘चांद्रयान 2’ चा वेग कमी करण्यात येणार आहे. भारत पहिल्यांदाच सॉफ्ट लँडिंग करणार असून हे यान चंद्रावर उतरण्याच्या आधीची 15 मिनिटं महत्त्वाची आहेत, असे के. शिवन यांनी सांगितले आहे. भारत सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाल्यास तो जगातला चौथा देश ठरणार आहे.

असा असणार ‘चांद्रयान २’ चा प्रवास
सुरुवातीला रॉकेटचा वेग नियमित असणार आहे. ‘चांद्रयान 2’ चंद्राच्या दिशेने झेपावल्याने इस्त्रोने पुन्हा एकदा एक नवा इतिहास रचला असून हे ‘चांद्रयान 2’ ची यात्रा 52 दिवसांची असणार आहे. सुरुवातीचे 23 दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेतच असणार आहे. त्यानंतर 250 वैज्ञानिकांची या यानावर नजर असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *