Media Control Online
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जरी २० ते २५ आमदार गेलेले असले तरी बाकी ३० आमदार मुंबईतच आहेत. याच आमदारांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. माझं एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन बोलणं झालंय. आमच्या दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली आहे. ते माझं नक्की ऐकतील. काही तासांत ते आपल्या सगळ्यासोबत असतील, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काळजीत असलेल्या सेना आमदारांमध्ये जान भरली.
जवळपास १५ ते २० मिनिटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या संवादानंतर मुख्यमंत्र्यांनी सेना आमदारांशी संवाद साधला. तुम्ही डगमगू नका. काळजी करु नका. माझं भाईंशी बोलणं झालंय. ते माझं ऐकतील. काही तासांत ते आपल्या सगळ्यांसोबत असतील, असा विश्वास त्यांनी सेना आमदारांना दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन गेलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्या फोनवरुनच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. ‘जय महाराष्ट्र साहेब’ म्हणत फोनची सुरुवात झाली. मी कोणता पक्ष काढला नाही, कोणत्याही पक्षाला शब्द दिला नाही, कुणाशी डील केली नाही, मग माझ्याविरोधात मुंबई-ठाण्यात वातावरण का पेटवलं जातंय? या एका प्रश्नाचं साहेब मला उत्तर द्या, असं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना म्हणाले, त्यावर तुम्ही काही काळजी करु नका. हे सगळं सुरळीत होईल. तुम्ही अगोदर मुंबईत या, आपण समोरासमोर भेटून बोलू… असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना म्हणाले. यावेळी १० मिनिटांच्या संभाषणात एकनाथ शिंदे यांनी वारंवार भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची मागणी केली.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर असलेला संसार आता बस्स झाला. आता आपण भाजपसोबत गेलं पाहिजे. भाजपसोबत सरकार बनविण्यातच आपलं भलं आहे, असं एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना म्हणाले. तुम्ही निर्णय घ्या, शेवटी तो तुमचा निर्णय आहे. मी माझा निर्णय घेतो, असंही एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना नि:क्षून सांगितलं.