भाजप नेत्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून विकृत टीका

कोल्हापूर प्रतिनिधी शरद गाडे :  राज्यात गेले काही दिवस राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी, माजी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत वाईट स्वरूपाच्या भाषेमध्ये टीका होताना दिसत आहे. सरकारने अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ,अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज केली.
आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांची भेट घेऊन निवेदन दिले.
आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सुद्धा सोशल मीडिया मधून जातीय आणि विकृत शब्दांमध्ये जाणीवपूर्वक काही पक्षाचे कार्यकर्ते टीका करताना दिसत आहेत.
याशिवाय सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या पोलिसांवर आणि डॉक्टरांवर हल्ले होते आहेत. हे अत्यंत लाजिरवाणे आहे. त्याबद्दल शासनाने अशा लोकांवर कठोर कारवाई करावी, सध्या महाराष्ट्रामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी चालू आहे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. पोलिसांचा गैरवापर करून कार्यकर्त्यांना मंत्र्याच्या बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण होते हे महाराष्ट्राला शोभणारे नाही.
देवेंद्र फडणवीस यांना एन्काऊंटर च्या धमक्या दिल्या जात आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करता सध्याचे सरकार आणि राज्याचे गृहमंत्री हे अत्यंत निष्क्रिय आहे ही गोष्ट सिद्ध होते. महाराष्ट्रातील ही दडपशाही ताबडतोब संपली पाहिजे. कार्यकर्त्यां वर दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत.
तसेच राज्यपाल व माजी मुख्यमंत्री फडणवीस, तसेच भाजपच्या इतर नेत्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून विकृत टीका करणाऱ्या लोकांवर ताबडतोब कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे, युवा मोर्चा उपाध्यक्ष दीपक माने, विश्वजित पाटील, कृष्णा राठोड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *