Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर प्रतिनिधी :
राजर्षी शाहू महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या कर्तृत्वाचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापुरात इतिहास घडला असून महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
कोल्हापूरकरांनी आपला स्वाभिमान जपत ताराराणीच्या भूमीमध्ये जश्रीताईंना पहिली महिला आमदार करण्याची भूमिका घेतल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी, ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे साहेब यांनी दिवंगत आ. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर जयश्री ताईंना संधी दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार साहेब, काँग्रेस गटनेते ना. बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक महाविकास आघाडीने एकजुटीने लढवली आणि बहुमतांनी जिंकली सुद्धा.
एकीचे बळ काय कमाल करू शकते याची प्रचिती या निकालातून आलेली आहे. महाविकास आघाडी ही जनतेच्या पसंतीस तर उतरलेली आहेच पण भाजपच्या विखारी राजकारणाला थांबवण्यासाठी महाविकास आघाडीला बळ देण्याचा निर्णय सर्व जनतेने घेतलेला आहे हे या निकालातून सिद्ध होते.
या निवडणुकीत भाजपने धर्माधर्मात द्वेष निर्माण करायचे, ध्रुवीकरण करायचे गलिच्छ राजकारण करायचा प्रयत्न केला. पण, राजर्षी शाहूंची नगरी असलेल्या कोल्हापुरात समतेचा विचार शाबूत ठेऊन विखाराला बळी न पडणाऱ्या सर्व स्वाभिमानी कोल्हापूरकरांचे मी मनापासून विशेष आभार मानतो.
कोल्हापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराराणी आणि राजर्षी शाहू महाराज यांचा पुरोगामी वारसा काय असतो याचा वस्तुपाठ आज घालून दिला आहे.