कागल हादरले… एकाच कुटुंबातील तिघांचा खून….!

कागल : कागल शहर आज तिहेरी हत्याकांडाने हादरले. पत्नी, मुलगा आणि मुलगी अशा तिघांचा गळा आवळून खून केला. प्रकाश बाळासाहेब माळी (वय ४२) असे त्याचे नाव आहे. येथील काळम्मावाडी वसाहतीजवळील घरकुलमध्ये दुपारी दोनपासून रात्री आठपर्यंत हा थरकाप उडविणारा घटनाक्रम घडला. त्यानंतर प्रकाश रात्री नऊच्या दरम्यान स्वतःहून कागल पोलिस ठाण्यात हजर झाला.

याबाबत कागल पोलिसांनी दिलेली माहिती अशी प्रकाश शहरातील काळम्मावाडी वसाहतीजवळील घरकुलमध्ये पत्नी, मुलगा व मुलीसह राहतो. या घरकुलातील तापी या संकुलात दोन क्रमांकाच्या खोलीत कुटुंब राहते. दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास मुले शाळेला गेल्याचे पाहून प्रकाशने पत्नी गायत्री (३७) हिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर सायंकाळी साडेपाचला मुलगा कृष्णात (१३) शाळेतून घरी आला. कृष्णात दिव्यांग आहे. प्रकाशने त्याचाही दोरीने गळा आवळला. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास बाहेर गेलेली मुलगी अदिती (१७) घरी आली. या वेळी प्रकाशने तिचाही गळा आवळण्याचा प्रयत्न केला. या वेळी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता प्रकाशने तिच्या डोक्यात वरवंटा मारला.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *