डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक महामेरू हरपला: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

कोल्हापूर, दि. ४ ऑगस्ट: ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावणारे महामेरू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशी शोकभावना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. कामत यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासात अतिशय महत्त्वाचे योगदान दिले. राज्याबरोबरच देशाच्या शैक्षणिक विकासासाठी त्यांनी अत्यंत ध्येयनिष्ठपणे काम करीत असताना व्यावसायिक शिक्षणाचा विकास व विस्तार यांसाठी त्यांनी अव्याहत परिश्रम घेतले. त्यांच्या या परिश्रमातूनच डी.वाय. पाटील समूहाचा शैक्षणिक वृक्ष विस्तारला. व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवाहात सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांचे समावेशन डॉ. पाटील यांच्यामुळे शक्य झाले. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठाने त्यांना सन २०१५ मध्ये डी.लिट. ही सर्वोच्च पदवी देऊन गौरविले. त्याचप्रमाणे सन २०२२ मध्ये विद्यापीठाचा प्राचार्य डॉ. रा.कृ. कणबरकर पुरस्कारही प्रदान केला. या पुरस्काराच्या रकमेच स्वतःकडील दहा लाख रुपयांच्या निधीची भर घालून संत साहित्याच्या क्षेत्रात प्रभावी कामगिरी करणाऱ्या व्यक्तींसाठी पुरस्कार योजना सुरू करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार विद्यापीठाने ‘पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील पुरस्कार’ प्रदान करण्यास सुरवात केली. डॉ. पाटील यांचा शिवाजी विद्यापीठ परिवाराशी प्रगाढ स्नेह होता. हा स्नेहभाव अखेरच्या क्षणापर्यंत कायम राहिला. त्यांच्या निधनामुळे शिवाजी विद्यापीठ परिवारावर दुःखाची छाया पसरली आहे. डॉ. पाटील यांना चिरशांती लाभो, अशी भावनाही कुलगुरूंनी व्यक्त केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *