Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : रोटरी क्लबच्यावतीने शहरातील १० क्षयरुग्णांना ६ महिन्यांकरीता दत्तक घेऊन त्यांना पोषण आहार (फुड बाक्सेट) देण्यात येणार आहे. याचा कार्यक्रम सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे संपन्न झाला. भारत सरकारने सन २२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याचे महत्वकांक्षी धोरण ठरविले आहे. महाराष्ट्रासह सर्व राज्यांनी २०२५ पर्यंत राज्य क्षयरोगमुक्त करण्यासाठीचा आराखडा तयार केला आहे. मायक्रोबॅक्टीरियम ट्युबरक्युलॉसिस या जंतुने माणसाच्या शरिरामध्ये प्रवेश केल्यामुळे क्षयरोग हा आजार होतो. क्षयरोग हा हवेव्दारे पसरणारा संसंर्गजन्य आजार आहे. या जंतुला मारणेसाठी रुग्णास ६ ते ८ महिने इतक्या जास्त कालवधीचा औषधोपचार घ्यावा लागतो. दिवसेंदिवस संसर्गजन्य प्रकारातील या वेगाने फैलावणाऱ्या रोगास अटकाव घालण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्याचा भाग म्हणून निदान, औषधोपचार या मोफत सुविधा शासन बऱ्याच वर्षा पासून पुरवित आहे.
परंतु क्षयबाधीत रुग्णाची इतर कोणत्याही रोगापेक्षा प्रतिकार शक्ती मोठ्या प्रमाणात कमी झालेली असते. शिवाय क्षयरोगावरील औषधोपचाराची मात्रा हि सुध्दा इतर रोगांच्या तुलनेत जास्त प्रमाणात असते. त्यामुळे क्षय बाधीत रुग्णास सामान्य रुग्णांपेक्षा प्रोटिनची भरपुर मात्रा असलेला सकस आहार मिळणे अत्यंत गरजेचे असते. अशा गरीब, गरजु रुग्णांना समाजातील सेवाभावी संस्था, दानशुर व्यक्ती यांनी पोषण आहारासाठी मदत करण्यासाठी पोषक आहाराच्या स्वरुपातच मदत करण्याचे आवाहन उप-आयुक्त रविकांत आडसुळ यांनी केले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन रोटरी क्लबने शहरातील १० क्षयरुग्णांना ६ महिन्यांसाठी दत्तक घेतले.
यावेळी आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा यांनी प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाची सखोल माहिती उपस्थितांना देऊन क्षय बाधीत रुग्णांमध्ये सकस आहाराचे महत्व विशद केले. तसेच रोटरी क्लब प्रमाणे समाजातील दानशुर व्यक्तींनी या सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होऊन क्षयरुग्णांना बरे होण्यासाठी किंवा समाजातून क्षयरोग निर्मुलन करण्याचे दृष्टीने प्रयत्न करावेत असे उपस्थितांना आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोटरीचे डिस्ट्रीक गव्हर्नर (डी.जी) व्यंकटेश देशपांडे यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी संसर्गजन्य रोगांमध्ये सेवा बजावीत असलेबाबत कौतुक करुन रोटरी क्लब क्षयरोग या संसर्गजन्य आजाराप्रती संवेदनशिल असून या पुढील काळात सुध्दा क्षयरोग निर्मुलनाकरीता रोटरी क्लब कायम अग्रभागी राहील याची ग्वाही दिली. तसेच रुग्णांनी वेळेवर औषधोपचार पुर्ण करुन निरोगी आयुष्य जगावे असे आवाहन केले. या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ.अमरसिंह पवार यांनी उपस्थित रोटरी क्लबचे पदाधिकारी यांनी प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत योजना यशस्वी करण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त स्वयंसेवी संस्था आणि दानशुर व्यक्ती यांच्यापर्यंत पोहचवुन क्षय मुक्त कोल्हापूर मोहिम यशस्वी करावी असे आवाहनही केले.
रोटरी क्लबचे धनंजय थोरात, राहुल काथरुट, डॉ.अभिजीत वज्रमुष्टी, दिपीन जाजु, प्रशांत मेहता व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्राचे आभार वैद्यकीय अधिकारी डॉ.रुपाली दळावी यांनी मानले. समाजातील स्वयंसेवी संस्था व दानशुर व्यक्तींनी या मोहिमेस सहकार्य करण्यासाठी मिरजकर तिकटी ईगल प्राईड बिल्डींग येथील महापालिकेच्या शहर क्षयरोग नियंत्रण कार्यालय या पत्यावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.