Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापुर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या स्वाभिमानी सभासदांनी विजय मिळवून दिला, त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व सभासदांचे आभार मानतो. माजी पालकमंत्र्यांनी केवळ द्वेषभावनेतून ही निवडणूक लादली. या निवडणूकीत विरोधकांनी प्रचार न करता, अपप्रचार केला. सहकार बदनाम करण्याचे काम केले. वैयक्तीक आणि हिन पातळीवरची टिका केली. त्यामुळेच राजाराम कारखान्याच्या सभासदांनी माजी पालकमंत्र्यांना चपराक लगावली आहे. अमल महाडिक यांनी, सातत्याने राजाराम कारखान्याचा विकास, सभासदांचे हित यावर लक्ष केंद्रीत केले आहे. राजाराम कारखान्याच्या विस्तारीकरणाचे मुद्दे मांडले आहेत. या विकासात्मक दृष्टीला सभासदांनी कौल देवून, ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने सर्व २१ जागा जिंकून, विरोधी गटाचा सुपडासाफ केला आहे. वास्तविक विरोधी गटाने या निवडणूकीत पैशाचा वारेमाप वापर केला. राजकारणातून, भ्रष्टाचारातून आणि शैक्षणिक डोनेशनमधून मिळवलेला पैसा राजाराम कारखान्याच्या निवडणूकीत पाण्यासारखा ओतला. मात्र कारखान्याच्या स्वाभिमानी सभासदांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवली. गेल्या २८ वर्षात महादेवराव महाडिक यांनी, सहकाराचे सुत्र सांभाळत, राजाराम कारखान्याचा पारदर्शी कारभार केला. त्यामुळेच विरोधकांना आणि त्यांच्या आमिषांना झिडकारून, सभासदांनी महादेवराव महाडिक यांचे नेतृत्व मान्य केले. या निवडणूकीत सत्ताधारी आघाडीला मदत आणि सहकार्य करणारे आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, खासदार धैर्यशिल माने, माजी खासदार निवेदिता माने, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी यांचे मनापासून आभार मानतो. हा ऐतिहासिक विजय १२२ गावातील शेतकरी सभासदांचा असून, यापुढे कोल्हापूर जिल्हयात भाजप आणि महाडिक गटाची विजयी घोडदौड कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला.