Getting your Trinity Audio player ready...
|
मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क
कोल्हापूर दि.26 महाविद्यालयीन युवकांना उद्योजकतेची माहिती व्हावी आणि स्वरोजगार विषयक शासकीय योजना कळाव्यात याकरिता २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२३ दरम्यान स्वावलंबी भारत अभियान कोल्हापूर तर्फे जिल्हास्तरीय उद्योजकता विकास यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अभियानाचे जिल्हा समन्वयक सी ए अनिल चीकोडी, व यात्रा प्रमुख दिग्विजय गरड यांनी पत्रकार परिषदेत दिली. विद्या प्रबोधिनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उद्योजकता विकास यात्रेची सुरुवात सोमवारी दिनांक २८ ऑगस्ट सकाळी साडेदहा वाजता शिवाजी विद्यापीठातून होणार आहे. उद्योजकता विकास यात्रेचा उद्घाटन कार्यक्रम न्यू पॉलीटेक्निक महाविद्यालयात होणार होणार आहे. यानंतर उद्योजकता विकासरथ १२ तालुक्यांतील ४० महाविद्यालयांमध्ये जाऊन व्याख्यान, चित्रफित, पत्रके आदींच्या माध्यमातून युवकांना उद्योजकतेविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
अनेक युवकांना व्यवसाय, उद्योग करण्याची इच्छा असते. परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांना व्यवसाय करणे शक्य होत नाही. त्यामुळे स्वावलंबी भारत अभियान कोल्हापूर तर्फे हा उपक्रम घेण्यात येत आहे. व्यवसाय कोणता व कसा निवडावा, व्यवसाय सुरू करण्यासाठीची पूर्वतयारी, शासकीय कार्यालयांमध्ये तसेच बँकामध्ये कागदपत्रांची पूर्तता कशी करावी आदी मार्गदर्शन यावेळी करण्यात येणार आहे.
उद्योजकता विकास यात्रेदरम्यान महाविद्यालय विद्यार्थी आणि लोकांशी संवाद साधून त्यांच्याकडून उद्योजकतेविषयी नव्या कल्पना एकत्र करण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्यातून एक अभिनव कल्पना निवडण्यात येणार असून संबंधित व्यक्तीस स्वावलंबी भारत अभियान तर्फे कोल्हापूर शहरात उपलब्ध असलेल्या व्यवसाय मार्गदर्शन केंद्र मार्फत मार्गदर्शन दिले जाणार आहे. उद्योजकता विकास यात्रेचा समारोप आठ सप्टेंबर रोजी घाळी महाविद्यालय गडहिंग्लज या ठिकाणी करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेस स्वावलंबी भारत अभियानाचे जिल्हा समन्वयक सी.ए. अनिल चिकोडी, उद्योजकता विकास यात्रा प्रमुख श्री.दिग्विजय गरड, स्वावलंबी भारत अभियान कोल्हापूर उद्योजकता केंद्र प्रमुख श्री.नितीन कामत आदी उपस्थित होते.