राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे – जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत काय करावे, तसेच काय करू नये या बाबींची सखोल माहिती करून घेऊन त्याचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज येथे दिले. 

लोकसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा परिषद मुख्य वित्त व लेखा अधिकारी राजेंद्र गाडेकर, निवडणूक खर्च समितीचे नोडल अधिकारी सुशीलकुमार केंबळे आणि अविनाश जाधव, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे आदी उपस्थित होते. 

जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, उमेदवारांनी विहित खर्च मर्यादेचे पालन करावे. तसेच, प्रचार करताना आवश्यक विविध परवानग्या घ्याव्यात. मंत्री महोदय व लोकप्रतिनिधी यांच्या निवडणूक काळातील प्रचार दौऱ्यासाठी शासकीय वाहने वापरू नयेत. भित्तीपत्रके, पोस्टर्स, हँडबिले याबाबत आवश्यक परवानग्या घ्याव्यात. प्रचारसभा, प्रचारफेऱ्या पूर्वपरवानगी शिवाय घेऊ नयेत. ध्वनीक्षेपण यंत्रणा सकाळी 6 पूर्वी व रात्री 10 नंतर वापरू नये. जात, धर्म, भाषा यांच्या आधारे प्रचार करू नये. जातीय किंवा धार्मिक ध्रुवीकरण होऊ नये, असे ते म्हणाले. यावेळी आचारसंहिता, दरपत्रक आदी विषयांवर राजकीय पक्ष प्रतिनिधींनी चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *