कोल्हापूर : भूजल पुनर्भरण, जलशक्ती अभियान, माझी वसुंधरा अभियान, कॅच द रेन, जलयुक्त शिवार तसेच गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजना वेगवेगळ्या विभागामार्फत चालविण्यात येत आहेत. या योजनांमधील जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पर्यावरण हितासाठी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी वृक्षारोपणासह पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करा तसेच गाळमुक्त धरण ही योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले.
भूजल पुनर्भरण विषयक जिल्ह्याचा आराखडा तातडीने राज्यस्तरावर मंजुरीसाठी पाठविण्याचे या बैठकीत ठरले. जनजागृती विषयक गावोगावी घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती ऑनलाईन स्वरूपात भरून नोव्हेंबर अखेर सर्व कामे पूर्ण करण्याचे ही निर्देशही यावेळी त्यांनी दिले. शाळा कॉलेजेस मध्ये जनजागृती कार्यक्रम घेऊन जनजागृती करा अशा सूचना त्यांनी उपस्थित समिती सदस्यांना दिल्या. या बैठकीला मृदू व जलसंधारण विभाग, भूजल, जिल्हा कृषी अधीक्षक, पाटबंधारे विभाग, व वन विभाग आदी विभागातील सदस्य उपस्थित होते.
राज्यातील जलसाठ्यांमधील गाळ काढणे व तो शेतामध्ये वापरणे यासाठी जलसाठ्यातील गाळ काढून तो शेतात पसरविण्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना कायमस्वरूपी राबविण्याचा निर्णय 20 एप्रिल 2023 रोजी च्या शासन निर्णयाने घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशासकीय संस्था तसेच ग्रामपंचायत यांच्यामार्फत एकूण 40 योजनांमधून एकूण 4 लाख 6 हजार 655 घनमीटर इतका गाळ काढण्यास कामाचे आदेश देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत 10 कामे पूर्ण असून 4 कामांची माहिती अवनी या ग्रामीण ॲप वरती भरण्यात आलेली आहे. तसेच लोकसहभागातून तीन कामे एनएचएआय मार्फत सात कामे सीएमजेएसवाय मार्फत 36 अशी एकूण 46 योजनांमधून 4 लाख 65 हजार 878 घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात जिल्हास्तरीय समितीच्या समक्ष आढावा घेण्यात आला. यामध्ये योजनेचा सद्यस्थितीतील आढावा, मागणीच्या अनुषंगाने प्रशासकीय मान्यता, कार्यवाही याबाबतची माहिती सादर केली.
जलयुक्त शिवार मधून शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटावा ही अपेक्षा आहे, यासाठी शेतकऱ्यांनी ठिबक तंत्रज्ञानाचे प्रमाण वाढवून पिकासाठी आवश्यक तेवढ्याच पाण्याचा वापर करावा. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे या बैठकीत ठरले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यावेळी म्हणाले, जर शेतकऱ्यांनी पिकाला आवश्यकतेनुसारच पाणी वापर केला तर त्यांच्या उत्पादकतेतही वाढ होणार आहे. त्यामुळे हा संदेश प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचवून त्याचे महत्त्व त्यांना पटवून द्यावे. गाळमुक्त धरण योजना राबवीत असताना शेतकऱ्यांच्या फायद्याचे असणारे नाला सफाई चे काम चांगल्या प्रकारे राबवा यातून सर्व नाले गाळमुक्त होतील आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. जानेवारीपासून या पद्धतीची कामे गतीने सुरू करा. सध्या शक्य असल्यास हातकणंगले, शिरोळ, जयसिंगपूर या भागातील कामे करता येत असतील तर तीही तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मात्र ही कामे करत असताना प्रत्येक ठिकाणचे अगोदरचे व नंतरचे छायाचित्र काढून कामातील बदल याचा अहवाल तयार करा. याचा उपयोग भविष्यात इतर शेतकऱ्यांना तेथील परिस्थिती दाखवून सांगता येईल. या योजनेत सहभागी होण्यासाठी पावसाळा सुरू आहे तोपर्यंत सर्व ठिकाणाहून प्रस्ताव एकत्रित करण्याच्या कामालाही गती द्या असे त्यांनी बैठकीत उपस्थित त्यांना सांगितले.