“मैयाळगण” हा चित्रपट नुकताच पाहीला चित्रपट संपल्यावर नकळत डोळे ओघळू लागले.

0 0

Share Now

Read Time:5 Minute, 36 Second

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

मैयाळगण हा चित्रपट नुकताच नेटफलिक्सवर पाहिला. चित्रपट संपल्यावर नकळत डोळे ओघळू लागले. पण तेव्हा मनात दुःख किंवा कसलीही बोच नव्हती, कदाचित ते अश्रू समाधानाचे असतील.

एखादा चित्रपट असा भिडण्याची वेळ फार क्वचित येते. अलीकडच्या बहुतेक चित्रपटात काहीतर वेगळं म्हणून, गुन्हेगारी, राजकारण, वैज्ञानिक किंवा आंतरराष्ट्रीय जगताशी निगडित विषय हाताळायची चढाओढ असते. एखादाच असा चित्रपट येतो की त्यात सामान्य माणसाच्या भावना मांडल्या जातात किंवा त्याचे पैलू सहज उलगडून दाखवतात…

आजच्या गळ्याशी आलेल्या धकाधकीच्या जीवनात अनेक आव्हानं आपण रोज पेलतो आहोत. त्यातून निर्माण होणारा मानसिक कोंडमारा सहन करतो आहोत. या सगळ्यातून सुटकेचा मार्ग नाहीये असं अजिबात नाही. पैसे कमवणे, जॉब वाचवणे, ट्रॅफिक, धावपळ, नात्यातील फसवाफसवी, राजकीय गदारोळ हे सगळं सोडून देऊन अगदी आनंदात जगता येऊ शकेल… त्यासाठी माफक गरजा आणि आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीवर असीम प्रेम करण्याची तयारी हवी… 

ही नेमकी जाणीव करून देणारा हा सिनेमा मैयाळगण म्हणजे

अरुल आणि कीर्ती दोघांची गोष्ट. भावकीने फसवून प्रॉपर्टी हडप केल्यावर रातोरात घर सोडून जाणाऱ्या तरुणाची गोष्ट. अत्यंत अनपेक्षित आयुष्य वाट्याला येऊनही त्यातून हिमतीच्या बळावर मार्ग काढणाऱ्या कीर्तीची गोष्ट. या दोन्ही नायकांचं आयुष्य समांतर रेषेत सरकते आहे. अचानक एक दिवस नायकाला गावी जाणे भाग पडते कारण त्याच्या लाडक्या बहिणीचं लग्न ठरतं. 

या लग्नाच्या प्रसंगात अरविंद स्वामी या नटाने ज्या प्रकारे अरूल साकारला आहे त्याला तोड नाही, विशेषतः त्याच्या लाडक्या बहिणीच्या पायात पैंजण बांधण्याचा प्रसंग बघताना अगदी दाटून येतं…अगदी पाहिल्या काही मिनिटांमध्ये घर सोडून जाण्याच्या प्रसंगात ती त्याला घट्ट मिठी मारून सोडून न जाण्यासाठी विनवते ते दृष्य आठवतं… 

आणि अरविंद लग्नात पोहोचल्यावर जो काही कीर्ती त्याचा ताबा घेतो त्या प्रसंगापासून सिनेमा चढत जातो… निरागसता, खरेपणा, पारदर्शकता हे सगळे गुण एकच व्यक्तीत ठासून भरलेले पहायला मिळतात. ही व्यक्ती अरविंदची अगदी जुनी ओळख असल्याप्रमाणे त्याच्याशी अतिशय सलागिने वागते. बघता बघता एकेक गाठ सुटत जाते… डॅम वर जाऊन बसण्याच्या प्रसंगापर्यंत अरविंद पुरता खुलला आहे. इतका की अगदी त्या तरुणाने अरविंदची चप्पल घातली तरी त्याला काही वाटत नाही. तो या तरुणाबरोबर गाणी गातो. बियर पितो, दिलखुलास गप्पा मारतो. बहिणीला लग्नात गिफ्ट देऊन आल्या पावली परत निघालेला अरविंद आता गावात रमतो.

का? 

कारण हा त्याचा बालपणीचा मित्र.

पण

या मित्राचं नाव त्याला आठवत नाही… 

इथून चित्रपटात एकप्रकारची अस्वस्थता तयार होते.

ते नाव अरविंदला आठवतं का? त्या तरुणाची ओळख पटते का? गावात त्याने घालवलेल्या एका रात्रीचा त्याच्या आयुष्यावर काय परिणाम होतो, हे सगळं जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहायला हवा.

कुशल विणकराने विणलेलं तलम वस्त्र असावं तसा हा चित्रपट आहे. किंवा सौंदर्याची, सहजतेची जी काही व्याख्या असेल ती सार्थ ठरवणारं उदाहरण म्हणजे हा सिनेमा.

हा चित्रपट पाहताना आपल्याही मनातल्या कित्येक गाठी हळूहळू सुटत जातात… किमान सैल तरी होतात.

बाकी चित्रीकरणातून तांजवूर मद्रास वगैरे परिसातील देखणा निसर्ग अधिक रसिकतेने दाखवला आहे. 

कथा, दृश्य मांडणी, संकलन सर्वच बाजूंनी हा सिनेमा मला खूप आवडला.

चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, अभिनय, संगीत अशा सर्वच पैलूंवर स्वतंत्रपणे लिहिता येईल. मला अजून एक नमूद करावीशी वाटली ती बाब म्हणजे कला दिग्दर्शन आणि नेत्रसुखद छायाचित्रण. तर असा हा सर्वतोपरी आवडलेला चित्रपट तुम्हीही जरूर पाहा.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *