कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या नातेवाईकांनी लवकरात लवकर कागदपत्रे सादर करावी : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

विशेष वृत्त : अजय शिंगे

कोल्हापूर, दि.२३ : कोरोनामुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांच्या नातेवाईकांनी कायदेशीर पालकत्वाबाबत कागदपत्रांसह माहिती लवकरात लवकर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाकडे सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या काळजीसाठी गठीत कृती दल समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा वैशाली बुटाले, संजय चौगले, जिल्हा सरक्षण अधिकारी,आशिष पुंडपळ, विधी अधिकारी तसेच समिती सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, कोरोनामुळे पालक गमावलेली मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तसेच अशी बालके शिक्षणापासून वंचित राहिली नसल्याचा अहवाल शिक्षण विभागाने सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केल्या.

कोरोनामुळे एक अथवा दोन पालक गमावलेल्या ०ते १८ वयोगटातील बालके आणि विधवा महिलांना शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ योजनेअंतर्गत तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. गरजूंनी संबंधित तहसीलदार किंवा तालुक्याचे बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे आवश्यक आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या कायदेशीर पालकत्वाची कागदपत्रे प्राप्त झाल्यावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून संबंधित नातेवाईकांना कायदेशीर पालकत्व देण्यासाठीची प्रक्रिया लवकर होऊ शकेल. त्याचबरोबर १८ वर्षापर्यंतच्या बालकांना महिला बालविकास विभागाकडून बालसंगोपन योजनेचा लाभ देता येईल. यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर होणे आवश्यक आहे.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या सद्यस्थितीबाबत तसेच कोरोनामुळे अनाथ बालके व विधवा महिलांना ‘मिशन वात्सल्य’ योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभाबाबत माहिती दिली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर हे अनुदान देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

____________________________________________

———-जाहिरात———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *