Getting your Trinity Audio player ready...
|
Media Control Online
आयसीसी महिला वर्ल्डकप २०२२च्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा १०७ धावांनी पराभव करून धमाकेदार सुरूवात केली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर विजयासाठी २४५ धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारतीय गोलंदाजीसमोर पाकिस्तानची डाळ शिजली नाही. गेल्या वर्षी दुबईत झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा पाकिस्तानने प्रथमच पराभव केला होता. या पराभवाचा बदला महिला संघाने घेतला. इतक नाही तर महिला संघाने पाकिस्तानविरुद्धच्या विजयाची परंपरा कामय ठेवली. भारताकडून राजेश्वरी गायकवाड(Rajeshwari Gayakwad)ने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या.
भारतीय कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताची अवस्था ६ बाद ११४ अशी झाली होती. पाकिस्तानने सामन्यावर मजबूत पकड मिळवली असताना भारताच्या स्नेह राणा आणि पुजा वस्त्रकर यांनी शतकी भागिदारी करून आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. भारताने दिलेल्या २४५ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात संथ झाली. त्यांनी १० षटकात फक्त २६ धावा केल्या होत्या. पण त्यांनी एकही विकेट गमावली नव्हती. ११व्या षटकात राजेश्वरी गायकवाडने पाकिस्तानला पहिला धक्का दिला. तिने जवेरिया खानला ११ धावांवर बाद केले. त्यानंतर पाकिस्तानचे फलंदाज खेळपट्टीवर फार वेळ टीकले नाहीत. भारतीय गोलंदाजांनी ठरावीक अंतराने विकेट मिळवल्या. दिप्ती शर्माने पाकिस्तानच्या कर्णधारीची विकेट घेत दुसरा धक्का दिला. त्यानंतर स्नेह राणाने पाकची तिसरी विकेट घेतली. भारताची सर्वात अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीने सलामीवीर सिद्रा आमीनला ३० धावांवर बाद करत पाकिस्तानची चौथी विकेट घेतली. त्यानंतर निदा डारला बाद करुन पाकचा निम्मा संघ माघारी पाठवला. पाकिस्तानचा निम्मा संघ ७० धावा पॅव्हेलियनमध्ये परतला होता. झुलन पाठोपाठ राजेश्वरीने आलिया रियाझ आणि फातिमा सना यांची विकेट घेत भारताचा विजय पक्का केला. भारताकडून राजेश्वरीने चार, स्नेह राणा, झुलन यांनी प्रत्येकी २ तर दीप्ती शर्मा आणि मेघना सिंग यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली
त्याआधी भारताच्या डावाची सुरूवात शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना (Smriti Mandhana) यांनी केली. पण ४ धावसंख्येवर भारताने शेफालीची विकेट गमावली. त्यांनतर स्मृती आणि दीप्ती शर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागिदारी करून संघाला चांगल्या स्थितीत आणले. दीप्ती ४० धावांवर बाद झाली. ही विकेट गमावल्यानंतर मात्र भारताची दाणादाण उडाली. भारताने २२ धावात ४ महत्त्वाच्या विकेट गमावल्या. भारत १५०पर्यंत तरी पोहोचेल का अशी शंका निर्माण झाली. दीप्ती शर्मा बाद झाल्यानंतर अर्धशतक पूर्ण करणारी स्मृती ५२ धावांवर बाद झाली. तिने ७५ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार मारला. त्यानंतर खराब फॉर्ममध्ये असलेली हरमनप्रीत कौर १४ चेंडूत फक्त ५ धावा करून माघारी परतली. ऋचा घोष देखील फार काळ टिकली नाही. तिला फक्त १ धावा करता आली. यामुळे भारताची अवस्था २ बाद ९२ वरून ५ बाद ११२ अशी झाली. अशातच टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला जेव्हा कर्णधार मिताली राज फक्त ९ धावा करून माघारी परतली. यामुळे भारताची अवस्था ६ बाद ११४ अशी झाली.
आलेल्या स्नेह राणा (Sneh Rana) आणि पुजा वस्त्रकर (Pooja Vastrakar) यांच्या मनात काही वेगळाच गेम प्लॉन सुरू होता. या दोघींनी भारतीय संघाला फक्त संकटातून बाहेर काढले नाही तर पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार देखील घेतला. स्नेह आणि पुजा यांनी सातव्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. या दोघांनी १२२ धावांची भागिदारी करून संघाला सुस्थितीत नेले. प्रथम पुजाने आणि त्यापाठोपाठ स्नेहने अर्धशतक पूर्ण केली. भारताने सहावी विकेट ३३व्या षटकात मिताली राजच्या रुपाने गमावली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांना भारताची विकेट मिळवण्यासाठी ५०व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. ५०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पुजा बाद झाली. तिने ५९ चेंडूत ८ चौकारांसह ६७ धावा केल्या. तर स्नेहने ४८ चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या, यात ४ चौकारांचा समावेश होता. अखेरच्या षटकात झुलन गोस्वामीने ३ चेंडूत ६ धावांचे योगदान दिले.