केडीसीसी च्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वतीने मंत्री श्री. मुश्रीफ यांचा सत्कार….!

कोल्हापूर/प्रतिनिधी :

एनपीएची संकल्पना अस्तित्वात आल्यापासून शून्य टक्के नेट एनपीए ही केडीसीसी बँकेची ऐतिहासिक कामगिरी आहे, असे गौरवोद्गार बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. तसेच, ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाअखेर बँकेला झालेला १८० कोटी ढोबळ नफा हा राज्य देशात उच्चांकी आहे, असेही ते म्हणाले.

Advertisements

३१ मार्च २०२२ या आर्थिक वर्षाअखेर बँकेला शून्य टक्के नेट एनपीए व १८० कोटी उच्चांकी ढोबळ नफा झाल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष व ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार अधिकारी, कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी व कर्मचार्‍यांच्यावतीने झाला. या सत्काराला उत्तर देताना मंत्री श्री. हसन मुश्रीफ बोलत होते.

भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, बँक स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच १८० कोटी इतका उच्चांकी ढोबळ नफा झालेला आहे. निर्यात साखर व इथेनॉलमुळे बँकेने साखर कारखानदारीला करावयाच्या कर्ज पुरवठ्यावर फार मोठा परिणाम होत आहे .चांगले नवीन ग्राहक शोधावे लागतील, नवनवीन व्यवसायात पैसे गुंतवावे लागतील. सर्वच पातळ्यांवर बँकांची स्पर्धा तयार झालेली आहे. या स्पर्धेला सक्षमपणे तोंड देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सज्ज राहणे काळाची गरज झाली आहे.

ग्राहक आपल्याकडे आपणहून चालत येतील हा भ्रम दूर करा, असा सल्ला कर्मचाऱ्यांना देतानाच ते म्हणाले, तुम्ही लोकांकडे जा आणि ठेवीदार, ग्राहक शोधा. बँकेच्या या यशस्वी वाटचालीचे श्रेय शेतकरी, सभासद, ग्राहक, हितचिंतक व अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाते, असेही ते म्हणाले.

“खंत ठेवींची……..”

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, गेल्यावर्षी सात हजार कोटी ठेवी होत्या. नैसर्गिक दहा टक्के वाढ धरली तरी त्या आजघडीला आठ हजार कोटी रुपयांच्या ठेवी पूर्ण व्हायला पाहिजे होत्या, अशी खंत व्यक्त केली. चालू आर्थिक वर्षात दहा हजार कोटी रुपये ठेवींच्या आणि वीस हजार कोटी रुपये व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आजपासूनच कंबर कसून कामाला लागा, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकपर भाषणात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने म्हणाले, कासं ठेवी वाढीसाठी कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळेत अध्यक्ष व मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी मार्गदर्शन करून तसेच कारखाने, सेवा संस्थांना ऊस बिलाची रक्कम शून्य टक्के पिककर्जाकडे वर्ग करण्याचे कळविले होते. त्यामुळे कासा ठेवींचे प्रमाणही वाढले. तसेच, दीर्घकालीन एनपीए वसुलीसाठी विविध दावे विविध न्यायालयात सुरू आहेत अशा दाव्यामधून झालेल्या आदेशाप्रमाणे वसुलीची कारवाई करताना महसूल विभागाकडे थकबाकीदार अर्ज करून वसुली विभागाला अडचणी निर्माण करतात. अशावेळी, अध्यक्ष हसनसाहेब मुश्रीफ यांनी संबंधित कार्यालयांकडे बँकेची बाजू सक्षमपणे मांडली. परिणामी, अडथळे दूर होऊन दीर्घकालीन थकबाकीची वसुली सोपी झाली. त्यामुळेच उच्चांकी ढोबळ वाढून नेट एनपीए शून्य झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *