Getting your Trinity Audio player ready...
|
Media Control Online
आमदारांवरील नजरकैद, मतगणितांच्या बेरजा-वजाबाक्या, आरोप-प्रत्यारोपांची राळ आणि विजयाच्या दाव्या-प्रतिदाव्यांनंतर आज, शुक्रवारी राज्यसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीवर महाविकास आघाडीचा वरचष्मा असल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसत आहे. अर्थात गणिती आकड्यांचे राजकीय अन्वयार्थ हे नेहमीच अपेक्षापेक्षा वेगळे असल्यामुळे संध्याकाळी हाती येणाऱ्या निकालांबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे
भाजपकडे स्वतःची १०६ मते आहेत. त्यांना राजू पाटील (मनसे), रत्नाकर गुट्टे (राष्ट्रीय समाज पक्ष), विनय कोरे (जनसुराज्य), रवी राणा, प्रकाश आवाडे, महेश बालदी, राजेंद्र राऊत (चौघे अपक्ष) या सात आमदारांचा पाठिंबा आहे. गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांची पार्श्वभूमी संघाची असल्याने त्यांचा पाठिंबाही भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अग्रवाल यांनी संजय पवार यांच्या उमेदवारी अर्जावर सही दिल्याने त्यांचे मत नक्की कुणाला जाणार, याबाबत साशंकता आहे. शिवसेना आमदारांची संख्या ५६ असून, अंधेरीचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ती ५५ झाली आहे. शिवसेनेला नऊ आमदारांचा पाठिंबा आहे. यात मंजुळा गावित, चंद्रकांत पाटील, राजकुमार पटेल, बच्चू कडू, आशिष जैस्वाल, शंकरराव गडाख, राजेंद्र पाटील यड्रावकर, नरेंद्र भोंडेकर आणि गीता जैन या आमदारांचा समावेश आहे
काँग्रेसचे ४४ आमदार असून त्यांना बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील (बोईसर), क्षितीज पाटील (नालासोपारा), हितेंद्र ठाकूर (वसई) या तीन आमदारांचा पाठिंबा असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. मात्र या तिन्ही आमदारांवर देवेंद्र फडणवीस यांचाच प्रभाव असेल, असे बोलले जाते. त्यामुळे या तिघांची मते महाविकास आघाडीचे नेते गृहित धरत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ आमदार असून, त्यातील अनिल देशमुख व नवाब मलिक हे ‘ईडी’च्या आरोपांमुळे तुरुंगात आहेत. तसेच त्यांना मतदान करू देण्यास न्यायालयाने मनाई केल्याने त्यांची मते सोडून राष्ट्रवादीची संख्या ५१ होते. त्यांना सहा आमदारांचा पाठिंबा असून त्यात देवेंद्र भुयार (स्वाभिमानी पक्ष), संजय शिंदे, केशव जोरगेवार (दोघे अपक्ष), शामसुंदर शिंदे (शेकाप), रईस शेख, अबू आझमी (दोघे समाजवादी पक्ष) यांचा समावेश आहे. तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपला पाठिंबा महाविकास आघाडीला जाहीर केला असल्यामुळे महाविकास आघाडीकडे विनोद भिवा निकोले यांचेही मत आहे. महाविकास आघाडीचे एकूण आमदार व सरकारला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या १७१ होते. मात्र यातील नवाब मलिक, अनिल देशमुख यांना आता मतदानाला येणे शक्य नसल्यामुळे ते दोन व हितेंद्र ठाकूर यांची तीन मते वजा केल्यास हा आकडा १६६ होतो. तर विनोद अग्रवाल यांच्यासह भाजप व त्यांच्या समर्थकांची संख्या ११४ होते. यात बहुजन विकास आघाडीची मते मिळवली तर ही संख्या ११७ वर जाते.