कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेता पाऊस असाच सुरु राहिला तर पाणी पातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. पाऊस, नद्यांची पाणी पातळी, धरणातील पाणी साठा यावर जिल्ह्याच्या आपत्कालीन यंत्रणेचे २४ तास लक्ष असून त्यानुसार सर्व यंत्रणा दक्ष व सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पूर परिस्थितीत कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्त हानी होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. पुरासंदर्भातील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. पूर परिस्थितीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन आपत्तीमध्ये होणारी संभाव्य हानी टाळुया.
सन २००५, सन २०१९ आणि सन २०२१ च्या महापुराचा अनुभव लक्षात घेता प्रशासनाने यावर्षी पूर परिस्थिती नियंत्रणासाठी सर्व प्रकारची जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्याच्या आत्कालीन विभागाच्या मदतीला एनडीआरच्या दोन तुकड्या जिल्ह्यात दाखलही झाल्या आहेत. यामधील एक तुकडी शिरोळ तालुक्यात तर दुसरी तुकडी कोल्हापूर शहरात सज्ज आहे. एनडीआरच्या तुकडीमध्ये प्रत्येकी २५ जवान असून मदत व बचाव कार्यासाठी आवश्यक साधन सामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. आत्पकालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची पथके व एनडीआरएफच्या पथकांच्या मदतीने मदत व बचाव कार्य केले जाणार आहे.
अचुक सुचनांसाठी पब्लिक ॲड्रेस सिस्टिम
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना अचुक सुचना मिळणे महत्वाचे असते. यासाठी जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आलेल्या पब्लिक ॲड्रेस सिस्टिमचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. या सिस्टिमद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांवर जिल्ह्यातील नागरीकांनी विश्वास ठेववा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
पाऊस, धरण साठ्यावर विशेष लक्ष
धरण परिक्षेत्रात होणारा पाऊस, नद्यांची पाणी पातळी, धरणातील पाणी साठा, धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग यावर नियंत्रण कक्षामार्फत २४ तास लक्ष ठेवण्यात येत आहे. धरण परिक्षेत्रात पाऊस वाढल्यास धरणातून पाणी सोडावे लागल्यास याबाबत नियोजन करण्यात आले असून अलमट्टी धरणातील विसर्गाबाबत पाटबंधारे विभागाने समन्वय ठेवला आहे.
पोलीस यंत्रणाही सज्ज
गत महापुराच्या अनुभव लक्षात घेता पुरामुळे पाण्याखाली जाणारे नदीवरील बंधारे, बंद होणाऱ्या रस्त्यांवरुन वाहतूक होणार नाही याची दक्षता घेऊन जिल्ह्यातील पूर परिस्थितीत वाहतुक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे नियोजन केले आहे. पुरामुळे जीवित हानी होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली असून वर्षा सहली येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे.
पालक सचिवांकडून आढावा
कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर परिस्थिती नियोजनाचा आढावा पालक सचिव प्रविण दराडे यांनी घेतला असून पूर परिस्थितीत व त्यानंतर करावयाच्या उपाय योजनांबाबत त्यांनी प्रशासनास सूचना दिल्या आहेत. अलमट्टी धरणातील विसर्गाबाबत कर्नाटक राज्याच्या पाटबंधारे विभागाशी समन्वय ठेवण्याबरोबरच कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गाबाबतही समन्वय ठेवावा. आपत्तीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ‘टीम लीडर’ म्हणून तर अन्य सर्व विभागांनी त्यांच्या मार्गदर्शनाने ‘टीम वर्क’ म्हणून काम करावे. स्थलांतरित कराव्या लागणाऱ्या नागरीकांना कॅम्पमध्ये अन्न, शुद्ध पाणी, आरोग्य सेवेसह आवश्यक सुविधा देण्यास प्राधान्य द्या. तसेच पूर बाधित गावांमध्ये रोगराई पसरु नये म्हणून औषध फवारणी करुन आरोग्य सेवांना प्राधान्य द्या,अशा सूचना प्रशासनास दिल्या आहेत.
विद्युत ट्रान्स्फार्मरची विशेष काळजी
पुरामुळे विद्युत ट्रान्स्फार्मर खराब होऊ नयेत, त्यांच्या दुरुस्तीसाठी अधिकचा कालावधी लागू नये, ट्रान्स्फार्मर तातडीने व कमी वेळेत, कमी खर्चात दुरुस्त व्हावेत यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात विशेष काळजी घेण्यात येत असून यासाठी एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. विद्युत ट्रान्स्फार्मरमध्ये पुराचे पाणी जावू नये यासाठी जेवढे डीपी पाण्याखाली जातात असे डीपी ओपनिंगच्या ठिकाणी प्लास्टिकच्या सहाय्याने बंद केले जावून ट्रान्स्फार्मरची पेटी वरुन सील केली जाणार आहे. अशा प्रकारे ट्रान्फाकचर्मर (डीपी) सील केल्याने कमी नुकसान होऊन त्याची त्वरीत दुरुस्ती होईल. यामुळे गावचा आणि गावच्या पाणी पुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा कमी वेळेत सुरु होईल. पूर बाधित गावांसाठी आवश्यक असणारे अधिकचे पॉवर ट्रान्स्फार्मर सबस्टेशन व तालुकास्तरावर उपलब्ध करुन ठेवण्यात आले आहेत. सुमारे ३ हजार मनुष्यबळामार्फत आपत्कालीन परिस्थितीत महावितरणचे कामकाज गतीने होणार आहे.
आरोग्य यंत्रणा सतर्क
साथरोग प्रतिबंधासाठी आणि पूर परिस्थितीत पुरेसा औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. रुग्ण्वाहिका, पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी मेडीक्लोर, क्लोरीन गोळ्याचे वाटप व सर्पदंशासह इतर सर्व अत्यावश्यक औषधे पुरेशा प्रमाणात संस्था स्तरावर उपलब्ध करुन ठेवली आहेत. याबरोबरच आरोग्य पथके व ट्रान्झिट पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.
नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना आवश्यक अचूक माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित राहणार आहे. आपत्कालीन मदतीसाठी या कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३१-२६५९२३२, ०२३१-२६५२९५०, ०२३१-२६५२९५३, ०२३१-२६५२९५४ आणि टोल फ्री क्रमांक १०७७ असून नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा.
जिल्ह्यातील जनतेनेही प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनास सहकार्य करावे, हीच अपेक्षा.