Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी :
एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळालेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची खदखद आता बाहेर पडू लागली आहे. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर लागलेल्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत मी एवढा मोठा त्याग केला मात्र पक्षाला माझी राज्यसभेला आठवण झाली नाही, अशी खदखद राजेश क्षीरसागर यांनी जाहीरपणे आज बोलून दाखविली. या विधानामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला कोल्हापूरातूनच राजेश क्षीरसागर यांच्याकडून विरोध होता हे आता स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेमध्ये बंड करत एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदार फोडले याचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यातही झाला असून कोल्हापूर शिवसेनेमध्ये ही आता मोठी खिंडार पडली आहे. कोल्हापूरचे विद्यमान दोन खासदार आणि आमदार यांच्यासोबत माजी आमदार राजेश क्षीरसागर हे शिंदे गटाला जावून मिळाले. यावेळी आपण हिंदुत्वाच्या मुद्यांवर भाजप सोबत गेलो असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता हळू हळू सर्वांची खरी खदखद समोर येत असून माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी अखेर त्यांच्या मनातील खदखद आज बाहेर काढलीच.
कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता मात्र दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक लागली आणि तेथे मी जिंकून आलो असतो मात्र एवढे असतानाही मातोश्रीचा आदेश म्हणून मी पोट निवडणूक लढवली नाही एवढा मोठा त्याग मी केला मात्र तरीही राज्यसभेच्या निवडणुकी वेळी माझा विचार न करता पक्षाने संजय पवार यांना उमेदवारी दिली अशी खदखद त्यांनी व्यक्त केली आहे.