Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : कोल्हापूर ‘गणपती बाप्पा मोरया, : पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आळवणी करत पारंपरिक वाद्यांच्या गजरात कोल्हापूर शहर परिसरात सोमवारी सकाळपासून घरगुती गौरी गणपतींचे विसर्जन झाले.ढोल, ताशे, बैंड, झांज, टाळ अशा पारंपरिक वाद्यांचा गजर, चुरमुरे, फुलांची उधळण आणि गणपती बाप्पा मोरया’चा अखंड जयघोष अशा उत्साही वातावरणात, जल्लोषात विसर्जन सोहळा मध्यरात्री पर्यंत सूरू होता.
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने पर्यावरणपूरक विसर्जनासाठी केलेल्या आवाहनास साथ देत कोल्हापूरकरांनी आपल्या लाडक्या बाप्पांचे पंचगंगा नदी, तसेच तलावात विसर्जन न करता कृत्रिम कुंडातून करून आपले कर्तव्यही सजगपणे बजावले.
गेल्या सहा दिवसांपासून कोल्हापुरात घराघरातून विघ्नहर्त्या गणरायाची प्रतिष्ठापना झाली. रोजची पूजा, आरती, विविध प्रकारचे नैवेद्य यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिरसातून न्हाऊन गेले होते. सोमवार उजाडला तशी गणेशभक्तांना हुरहुर लागली. बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी लगबग सुरू झाली. सायंकाळी पाच वाजल्यानंतरच खरी गर्दी उसळली. भाविक मोठ्या संख्येने सहकुटुंब, सहपरिवार गणपती विसर्जनासाठी
कोल्हापूर महानगरपालिकेने पर्यावरणपूरक विसर्जन व्हावे म्हणून संपूर्ण शहरात १८० कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली होती. तर २२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही आपल्या मंडळाच्या आवारात पाण्याच्या काहिली ठेवल्या आहेत. गणेशभक्तही या उपक्रमास साथ देत आपल्या मूर्ती या कृत्रिम कुंडात विसर्जित करत होते.
इराणी खण, रंकाळा तलाव, कोटीतीर्थ, राजाराम तलाव, राजाराम बंधारा परिसरात मोठी गर्दी उसळली. पंचगंगा नदीघाटावर मात्र कोणालाही सोडण्यात येत नव्हते. गायकवाड पुतळ्याजवळ ठेवलेल्या कृत्रिम कुंडातच भाविकांनी मूर्ती विसर्जित केल्या. उपनगरांत अनेक ठिकाणी कृत्रिम कुंड, काहिली ठेवल्या होत्या…