Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : मराठी रंगभूमीला आशयघन नाटकांची थोर परंपरा लाभली आहे. मनोरंजनासोबतच डोळ्यांत अंजन घालणारी नाटकेही मराठी नाट्यरसिकांनी डोक्यावर घेतली आहेत. नाटक हे अभिव्यतीचे उत्तम माध्यम म्हणून अनेक नाटककार नाटकाकडे पाहत असतात. अनेक नाटके प्रेक्षकांना अंतर्मुख करून विचार करायला भाग पाडत असतात. समाजात वैचारिक क्रांती घडवणाऱ्या या नाटकांच्या यादीत आता आणखी एका नाटकाची भर पडणार आहे. ‘आर यु ब्लाइंड?’ असा सवाल करत एक नवे कोरे नाटक पुण्यातल्या यशस्वी प्रयोगानंतर १६ सप्टेंबरला सायंकाळी ७.०० वाजता केशवराव भोसले नाटय़गृह, कोल्हापूर, १७ सप्टेंबर, दुपारी ४.३० वाजता भावे नाट्यमंदिर, सांगली, तर १८ सप्टेंबर सायंकाळी ७.०० वाजता शाहू कला मंदिर, सातारा येथे ‘आर यु ब्लाइंड?’चे प्रयोग होणार आहेत.
चार्ली स्टुडिओनिर्मित आणि मिलाप प्रस्तुत ‘आर यु ब्लाइंड?’ विशाल कदम यांच्या लेखणीतून अवतरलेलं
हे नाटक समाज कसा विघातक होत चाललाय, दिशाहीन बनत चालला आहे, आपण या देशाचे उत्तम नागरिक होण्यापेक्षा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते होऊन आपलच कसे नुकसान करीत आहोत, सगळ्याच धर्मांचा धार्मिक उन्माद, विचारवंतांच्या हत्त्या हे सगळे आपल्याला कुठे घेऊन निघालय, यावर हे नाटक सडेतोड भाष्य करत. या नाटकाचे दिग्दर्शन विक्रम-प्रणव या जोडगोळीने केले आहे. आजूबाजूला असंख्य घटना घडत असतात, पण आपल्याच विश्वात रमलेले आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करत असतो. डोळ्यावर पट्टी बांधून जगत राहतो, ही खरेतर आपल्यातल्या माणूसपणाची आपणच केलेली हत्त्या आहे. हे दर्शवणार या नाटकाच पोस्टरदेखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतेय. राजकारणाचा घसरलेला दर्जा, सोशल मीडियामधून माहिती घेऊन स्वतःला ज्ञानी समजणारे आजचे तरुण हे या समाजासाठी किती घातक आहे, हे दाखवून देणार, कुठल्याही गोष्टीकडे बघताना आपल्याला जसे सांगितले जातेय, जे दाखवल जातेय, ते तसेच आहे का? याचा व्यापक विचार आपण प्रत्येकानेच करायला हवा, आपली सदसद्विवेक बुद्धी वापरायला हवी हे सांगणार, विकास म्हणजे नेमक काय? हा विकास आपल्याला विनाशाकडे तर घेऊन जात नाहीये ना, याचा विचार करायला प्रवृत्त करणारे, कार्यकर्ते होऊन राजकीय पक्षांचे गुलाम होण्यापेक्षा, एक मतदार म्हणून आपण सत्तेत असणाऱ्या पक्षाला प्रश्न विचारले पाहिजेत, मग तो पक्ष कोणताही असो तरच येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण एक चांगला समाज निर्माण करू शकू, याची जाणीव करून देणार हे नाटक आहे.
डॉ. रमेश खाडे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. विक्रम पाटील, प्रणव जोशी आणि सागर पवार हे कलाकार नाटकात मुख्य भूमिका साकारत आहेत. नेपथ्य देवाशीष भरवडे यांनी केलं असून, संगीत संकेत पाटील यांनी दिलं आहे. श्याम चव्हाण यांनी प्रकाश योजना केली आहे आणि नाटकाचे पोस्टर कनक चव्हाण यांनी केले आहेत.