Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : शेतकऱ्यांचे श्रममंदिर असलेला सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना देशात सामर्थ्यशाली बनवू, असा विश्वास संस्थापक व आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी व्यक्त केला. गेल्या हंगामाच्या उताऱ्यावर आधारीत यावर्षीही एकरक्कमी एफआरपी देणार, असा पुनरुचारही त्यांनी केला.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या आठव्या गळीत हंगामाच्या प्रारंभात आमदार श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील होते.
भाषणात आमदार हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, यावर्षी एक लाख लिटर ज्यूसपासून इथेनॉल निर्मिती आणि बायो सीएनजी हे प्रकल्प हाती घेतले आहेत. पुढच्या हंगामापासून विस्तारवाढीसह दहा हजार टन क्षमतेने गाळप होईल. कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांकडून एकरक्कमी एफआरपी दिली जात आहे.
जिल्ह्यातील साखर कारखानदारी अडचणीत असताना केडीसीसी बँक साखर कारखान्यांच्या आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभी आहे.
केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासह शेतकऱ्यांना सोयी- सुविधा तसेच विविध आर्थिक मापदंड कारखान्याने यशस्वीरित्या पार केलेले आहेत.
“मापात पाप दुर्दैवी…..”
आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, शेतकरी संघटनेने साखर कारखान्यांवर काटामारीचा गंभीर आरोप केला आहे. ही बाब निश्चितच दुर्दैवी आहे, असे सांगतानाच ते म्हणाले, जिथे कुठे शंका असतील तिथे शेतकऱ्यांनी ऊस वजन करूनच न्यावा. ऊस वजनाची व्यवस्था ऑनलाईन होण्याची गरज आहे.
“अगर तुम ना होते……!”
आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, खडतर परिस्थितीतूनच राजकीय आणि सामाजिक जीवन आलो. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि संघर्षातून शेतकऱ्यांच्या पाठबळावर कारखानाही उभारला. या सगळ्यात सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे योगदान मोठे असल्याचे सांगताना ते म्हणाले, “हमे और जीने की चाहत ना होती, अगर तुम ना होते…..!”
स्वागतपर भाषणात अध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले, या हंगामात नऊ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. सहवीज प्रकल्पामधून नऊ कोटी युनिट वीज निर्मितीसह सव्वा कोटी लिटर इथेनॉल निर्यातीचे उद्दिष्ट आहे. कारखान्याच्या विविध विकास योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. पिकिवलेला सर्वच्या सर्व ऊस कारखान्याला गाळपासाठी पाठविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे म्हणाले, संस्थापक आमदार हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाने या कारखान्याने अनेक उच्चांक निर्माण केले आहेत. कारखान्याने शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, उच्च व आधुनिक तंत्रज्ञानासह नाविन्यपूर्णतेचा ध्यास घेतल्याचे ते म्हणाले.
व्यासपीठावर गोकुळचे संचालक युवराज पाटील, बिद्रीसाखर कारखान्याचे संचालक गणपतराव फराकटे, दिग्विजय उर्फ भैया पाटील, गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष किरणअण्णा कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, प्रवीणसिंह भोसले, काशिनाथ तेली, शिरीष देसाई, विकास पाटील रश्मीराज देसाई, गुंडेराव पाटील, राहुल शिरकोळे आदी प्रमुख उपस्थित होते.