Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे संयुक्त सरकार ग्राम विकासाचा रथ अतिशय जोमाने पुढे नेईल, यासाठी नूतन सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी गावच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट घ्यावेत,असे प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
सर्किट हाऊस जवळील महासैनिक दरबार हॉल या ठिकाणी हा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे होते. तर प्रमुख उपस्थित म्हणून माजी आमदार सुरेशराव हाळवणकर ,महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे हे होते.
यावेळी बोलताना चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्हयात भारतीय जनता पार्टीने अतिशय घवघवीत यश संपादन केलेले आहे. भारतीय जनता पार्टीचे तब्बल १२१ च्या आसपास सरपंच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निवडून आलेले आहेत. तर १००० पेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहेत .या निवडून आलेल्या सदस्यांना विकास कामासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही याची दक्षता आम्ही सर्वजण घेऊ.
नूतन सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना फेटे, गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर संक्रांति निमित्त सर्वांना तिळगुळ देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दादांनी दिल्या.
यावेळी बोलताना भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार सुरेशराव हाळवणकर म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये एखादा सरपंच निवडून आला तरी सर्वांना आनंद व्हायचा, पण आज या जिल्ह्यामध्ये सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या मध्ये भारतीय जनता पार्टी ही नंबर वन ला पोहोचलेली सर्वात मोठी पार्टी आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे हे ग्रामपंचायतचे निवडणुकीचे चित्र पाहून आगामी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी प्रथम क्रमांकावरच राहील याचा विश्वास आम्हाला वाटतो.
त्यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीचे निकाल लागल्यानंतर सर्वाधिक सरपंच निवडून आल्यावर पत्रकार परिषद घेऊन या सरपंच पदाची यादी जाहीर करणारी सगळ्यात मोठी जिल्ह्यातील पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी आहे. जिल्ह्यातल्या बाळासाहेबांची शिवसेना,रिपब्लिकन पार्टी, ताराराणी आघाडी, जनसुराज्य अशा भाजपच्या मित्र पक्षांनी मिळून या जिल्ह्यातील २५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतवर सत्ता मिळवलेली असून भविष्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जनाधार कुणाला आहे हे या निमित्ताने आता सिद्ध झालेले आहे. त्यामुळे या निवडणुका आपल्याला जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ दिले जाईल.
यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील १२१ सरपंच ११४ उपसरपंच तर ९७२ ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा सत्कार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील,उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री भरमुआण्णा पाटील,शिवाजीराव पाटील, अशोकराव माने, बाबासाहेब हिंदुराव पाटील, के.एस. आण्णा चौगले, मनोहर काटकर, राजाराम शिपुगडे, संभाजी पाटील, राहुल देसाई, मानसिंग उर्फ मुन्ना पाटील, अल्केश कांदळकर ,बाळ घोरपडे, एम. पी. पाटील,संजय पाटील, यांचे सह कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.