Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : मुंबई- पुण्यावरुन जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवले जाईल. कोणत्याही परिस्थितीत त्यांना घरी सोडले जाणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न करु नये. जेथे आहात तेथेच घरी सुरक्षित रहा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.
दुधाचे टँकर, रुग्णवाहिका, इतर जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून व्यक्तींची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, अशी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शिवभोजन थाळीच्या चांगल्या निर्णयाचा 500 सामान्य नागरिकांना आज फायदा झाला आहे. इचलकरंजीतील निरामय आणि अलायन्स हॉस्पिटल अधिग्रहीत केली आसून गडहिंग्लजमधील केदारी रेडेकर हॉस्पिटल व पारगावचे वारणा हॉस्पिटलचाही उपयोग आपल्याला होणार असल्याने जिल्ह्यामध्ये दुर्देवाने वेळ आली तर सगळ्या दृष्टीने तयारी आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.
दूध उत्पादकांनी दूध उत्पादन करणाऱ्यांचे दूध न नाकारता त्याचे संकलन करावे व शेतकऱ्यांसाठी दिवसाचा वीज पुरवठा करता येईल का यासाठी प्रयत्न करीन. यामध्ये निश्चित यश मिळेल. प्रशासनामार्फत योग्य ती उपाय योजना करण्यात येत आहे. एक रुग्ण सापडल्यावर 100 लोकांना होम क्वॉरंटाईन करण्याची वेळ येत असून नागरिकांनी लक्षणे असतील तर ताबडतोब प्रशासनाला संपर्क करावा आणि होम क्वॉरंटाईन व्यक्तींनी घराबाहेर पडू नये.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून सव्वा कोटी रुपयांचे व्हेंटिलेटरर्स विकत घेतले आहेत. मास्क, ग्लोव्हज आवश्यक त्या सर्व सुविधा कमी पडणार नाहीत यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे त्याचप्रमाणे १०० खाटांची व्यवस्था सीपीआर मध्ये करण्यात आली असून नागरिकांनी फक्त घरात राहून आम्हाला सहकार्य करावे, अशी विनंती पालकमंत्र्यांनी नागरिकांना केली.