Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी येत्या अधिवेशनात आवाज उठवू, अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. यासंदर्भात २८ फेब्रुवारीला होणाऱ्या मुंबईतील संपातही आपण सहभागी होणार असून कोल्हापूरमधील सर्वपक्षीय आमदारांना आवाहन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने अजिंक्यतारा येथे आ.पाटील यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले यावेळी ते बोलत होते.यावेळी बोलताना आ.पाटील म्हणाले, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडी सरकारकडून उपयोजना करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पण सरकार बदलले.
राज्य शासनातील संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे. हे प्रश्न सोडविल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, येत्या अधिवेशनात या विषयी आवाज उठवू. अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. कोरोना सारख्या कठीण काळात तुम्ही सर्वांसाठी काम केले, आता तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही काम करू असा विश्वास त्यांनी दिला. २८ फेब्रुवारीला मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनात स्वतः सहभागी होत असून, कोल्हापूरची वेगळी ओळख दाखवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदारांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महविकास आघाडी सरकार मधील तत्कालीन मंत्री यशोमती ठाकूर यांच्या पत्राची प्रत आणि मागण्याचे निवेदन यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांना देण्यात आले. यावेळी संगीता पोवार यांनी, सध्याच्या मानधनात घरखर्च चालत नसल्याची खंत व्यक्त करत, यामध्ये दुप्पट वाढ करण्याची मागणी केली. निवृत्ती नंतर मिळणाऱ्या एक लाख रुपयांमध्ये पुढचे आयुष्य कसे जगावे ? असा प्रश्न उपस्थित करत, पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी केली.
उषा कडोकर यांनी, अधिकाधिक महिला ह्या विधवा किंवा परितक्त्या असून त्यांना या मानधनात उदरनिर्वाह भागात नसल्याने दुसऱ्यांची धुणीभांडी करण्याची वेळ आली असल्याची खंत व्यक्त केली. सारिका पाटील यांनी, आमदार ऋतुराज पाटील हे आमच्या पाठीशी भावा सारखे उभे राहतील आणि आमचे प्रश्न सोडवून आम्हाला रक्षाबंधन भेट देतील, असा विश्वास व्यक्त केला.
कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी आम. ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेचे स्वागत केले. आम पाटील स्वतः या आंदोलनात सहभागी होत असल्याचा मनस्वी आनंद होत आहे. आताच्या सरकारने आश्वासनांची पुर्तता केली नाही, त्यामुळे हा संप करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या उपाध्यक्ष जुलेखा मुलांणी, छाया तिप्पट, सचिव सुवर्णा तळेकर, सहसचिव लता कदम, उषा कडोकर, आक्काताई उदगावे, बिस्मिल्ला शिकलगार, प्रियांका पाटील, कल्पना पिलारी यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.