ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या घोषणेमुळे ठाणे जिल्ह्यातही आदर्श आचारसंहिता लागू झाली असून तिचे काटेकोर पालन केले जाईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
१९५० हेल्पलाईन, सी व्हीजिल मोबाईल एप, भरारी पथके, सीसीटीव्ही यंत्रणा अशा विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देखरेख व नियंत्रण ठेवले जाईल. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीना देखील याबाबतीत अवगत करण्यात आले आहे, असे सांगून त्यांनी पोलीस यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वय असून निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणुका होतील असा विश्वास व्यक्त केला. ठाणे जिल्ह्यात २३-भिवंडी, २४-कल्याण आणि २५-ठाणे असे ३ लोकसभा मतदारसंघ आहेत. याठिकाणी २९ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे.
या पत्रकार परिषदेस ठाण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार, भिवंडीचे निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे, कल्याणचे निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी कादबाने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोलकर उपस्थित होत्या.
माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती
आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत जिल्ह्यातील निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याकरीता जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा माहिती अधिकारी या समितीचे सदस्य सचिव असतील. पेड न्यूज संदर्भातही समिती कार्यवाही करेल.
भरारी पथके
जिल्ह्यात ७२ भरारी पथके नेमली असून २१ व्हीडिओ देखरेख पथके, तसेच ७२ स्थिर देखरेख पथके असणार आहेत. एकूण ६२ हजार कर्मचारी ही निवडणूक पार पाडणार असून निवडणूक कामांत हयगय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही राजेश नार्वेकर म्हणाले.
सर्व राजकीय पक्ष, प्रसिद्धी माध्यमे आणि शासकीय विभाग प्रमुख यांच्याबरोबर बैठका घेऊन त्यांना आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी “काय करावे किंवा करु नये” (“DOs & DON’Ts)ची प्रत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळhttps://eci.nic.in वर निवडणुकीसंदर्भातील सर्व सूचनांचा तपशील उपलब्ध आहे. उमेदवारांनी दाखल केलेली शपथपत्रे व खर्चाचे तपशील वेळोवेळी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
मतदारांची संख्या वाढली
सन 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीच्या तुलनेत दिनांक दि.31 जानेवारी 2019 रोजी प्रकाशित अंतिम मतदार यादीनुसार ठाणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
तपशिल | सन 2014 | सन 2019 | वाढ | % वाढ |
एकूण मतदार | 5513525 | 6094308 | 580783 | 10.53 |
पुरुष मतदार | 3036581 | 3322965 | 286384 | 9.43 |
महिला मतदार | 2476912 | 2771003 | 294091 | 11.87 |
तृतीयपंथी मतदार | 32 | 340 | 308 | 962.50 |
मतदार-लोकसंख्या गुणोत्तर | 62.31 | 70.79 | 8.48 | 13.61 |
स्त्री-पुरुष गुणोत्तर | 816 | 834 | 18 | 2.21 |
मतदार यादीमध्ये उपलब्ध छायाचित्रांची संख्या | 3795366 | 5244530 | 1449164 | 38.18 |
एकूण मतदार ओळखपत्रांची संख्या | 3951959 | 5323235 | 1371276 | 34.70 |
मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु
मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु असून ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, असे सर्व नागरिक त्या त्या टप्प्यातील उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या 10 दिवस अगोदरपर्यंत दाखल करु शकतात.
दिव्यांग मतदारांसाठी सुविधा
ठाणे जिल्ह्यामध्ये ३८८३ एवढे दिव्यांग मतदार, मतदार यादीमध्ये चिन्हांकित केलेले असून त्यांना मतदान करण्यात अडचण येऊ नयेम्हणून सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. त्यांच्यासाठी आवश्यकता भासेल तिथे वाहनांची सोय तसेच व्हील चेअर्सदेखील उपलब्ध करून देण्यात येतील. आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, अपंगांसाठी रॅम्पची व्यवस्था, व्हील चेअरवरील अपंगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा व फर्निचर इ. किमान सुविधा (Assured Minimum Facilities) पुरविण्यात येत आहेत.
इव्हीएम मशीन्स, व्हीव्हीपॅटची उपलब्धता
ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण ६४८८ मतदानकेंद्र असून यामध्ये सहायकारी मतदान केंद्रांची वाढ होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये 14634 बीयु, 8368 सीयु व 9299 व्हीव्हीपॅट एवढी यंत्रे उपलब्धआहेत अशी माहितीही त्यांनी दिली.
मोबाईल ॲपचा वापर
आदर्श आचारसंहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सी व्हिजील या मोबाईल ॲपचा वापर केला जाणार आहे. नागरिकांना एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे या ॲपमध्ये छायाचित्र अथवा व्हिडीओ काढून तक्रार नोंदविता येणार आहे. पीडब्ल्यूडी ॲपद्वारे जिल्ह्यातील दिव्यांगांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हील चेअरची मागणी नोंदविणे इ. सोयी उपलब्ध करुन घेता येतील.
हेल्पलाईन
1950 ही हेल्पलाईन राज्यस्तरावर (State Contact Centre) तसेच जिल्हास्तरावर (District Contact Centre) कार्यरत करण्यात आली असून मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येईल. ही सुविधा 24 तास उपलब्ध असणार आहे.
पुरेसे पोलीस बळ तैनात
जिल्ह्यातील निवडणुका व्यवस्थित पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्यासमवेत ५ ते ६ बैठका घेण्यात आल्या असून ७१८ पोलीस अधिकारी ८ हजार ३६० पोलीस कर्मचारी एवढे मनुष्यबळ तैनात करण्यात येत आहे.