Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापुर प्रतिनिधी, कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री नामदार हसन साहेब मुश्रीफ यांची प्रतिक्रिया…
करवीर निवासिनी आई श्री. अंबाबाई देवीच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या पाठबळाने मला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे. गेल्या ३५ -४० वर्षांच्या राजकीय व सामाजिक जीवनात ज्या -ज्या संधी मला जनतेने दिल्या, त्या सर्वांच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या या पालकमंत्री पदाच्या माध्यमातूनही जनसेवेच्या रूपाने सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. कोणताही राजकीय अभिनिवेश न आणता कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि पर्यायाने सर्वच घटकांच्या विकासासाठी मी काम करीन. कार्यकाळ कमी आहे. लोकांच्या माझ्याकडून अपेक्षाही जास्त आहेत, या सगळ्याची मला जाणीव आहे. त्यासाठी मी कठोर कष्ट घेईन. कोणावरही अन्याय होणार नाही, याची मी काळजी घेईन.
दरम्यान; नांदेड येथील सरकारी रुग्णालयातील दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जल्लोष करू नये. मी कोल्हापुरात आल्यानंतर मिरवणूकसुद्धा काढू नये. नांदेडमधील त्या दुर्दैवी दुर्घटनेमुळे मी हार -तुरेसुद्धा स्वीकारणार नाही, अशी माझी नम्र विनंती आहे. माझ्यावर आलेल्या या नव्या जबाबदारीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जनतेने मला सहकार्य करावे आणि आशीर्वाद द्यावेत, अशी माझी विनंती आहे..
असे मंत्री मुश्रीफ यांच्याकडून पत्रक प्रसिद्ध माध्यमांना देण्यात आले.