Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/ अजय शिंगे – कोल्हापूर म्हणजे फुटबॉल नगरी अशी जगभरात ओळख असलेले आपले शहर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत असते.
फुटबॉल म्हंटले की पेठांमधील इर्षा प्रत्येक सामन्यात दिसून येतेच. गेली कित्येक वर्षं कोल्हापूर मध्ये हा इर्षेचा खेळ सुरू आहे. पण अलीकडच्या काळात या इर्षेचे हुल्लडबाजीत जास्त रूपांतर झाले आहे. याची प्रचिती आपल्याला गेल्या काही वर्षात मैदानात दिसून आली आहे. समर्थकांमधील वाद, पंचासोबतचे वाद, के एस ए सोबतचे वाद, खेळाडूंमध्ये होणारे वाद अशा विविध प्रकारच्या घटनांनी कोल्हापूरचा फुटबॉल नेहमीच वादग्रस्त बनला आहे. अश्लील हावभाव,अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, मैदानात दगड बाटल्या चप्पल फेकणे पंचाना धमकी देणे अशा गोष्टी हल्ली जास्त प्रमाणात होत आहेत मैदानात पोलिस असून देखिल यांना भीती नसते, के एस ए च्या नियमांचा पूर्णपणे भंग करून यांची हुल्लडबाजी सुरूच…
अशाच गोष्टींमुळे कोल्हापूरचा फुटबॉल कितीतरी वेळा बंद झाला होता. कितीतरी वेळा प्रेक्षकांविना कितीतरी सामने खेळवले गेले, मैदानात सीसीटीव्ही बसविले, समर्थकांना त्यांच्या संघाला नोटिसा दिल्या परंतु या हुल्लडबाजीला ब्रेक काय लागलाच नाही…
सध्या शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या शिव शाहू फुटबॉल स्पर्धेतील अंतीम सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ आणि शिवाजी तरूण मंडळ यांच्यात अतिशय रोमहर्षक सामना सुरू असताना पाटाकडीलचा गोलरक्षक आणि मंडळचा खेळाडू यांच्यात फुटबॉल वर ताबा मिळवण्यासाठी चढाओढ झाली. त्यातच दोघांचा वाद झाला. त्याचे परिणाम काही सेकंदात दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांच्या अंगावर धाऊन गेले धक्काबुक्की झाली, हाणामारी झाली अक्षरशः मैदानात एखद्या सिनेमाचा फाईटिंग सिन सुरू आहे असे वाटू लागले. आपल्या खेळाडूला चुकीच्या पद्धतीने अडवले म्हणून समर्थकांनी मैदानात बाटल्या आणि चपलांची फायरींग सुरू केली. पंचाना निर्णय घेण्यास वेळच दिला नाही. संयोजक समितीने हस्तक्षेप करुन दोन्ही संघांना बोलवून समजवले पण एक संघ खेळायला तयारच नव्हता पंचांनी निर्णय देण्या आधीच ते निर्णयास विरोध करू लागले. शेवटी पंचांनी दोन्ही संघाकडून प्रतीसाद न मिळाल्या मुळे 18 मिन. वाट पाहून मैदान सोडले. त्यानंतर देखिल हा वाद सुरूच राहिला पाटाकडीलचे कोच आणि कॅप्टन यांनी मीडिया समोर येऊन जाहीर केले की पंचांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे आम्ही मैदान सोडले नाही आम्ही खेळायला तयार आहे. शिवाजी तरूण मंडळ देखिल खेळायला तयार होते पण त्यांना पंचाचा निर्णय मान्य नव्हता. मैदानात सुरू झालेला वाद हा खेळाडूंच्या ड्रेसिंग रूम पर्यंत गेला दोन्ही बाजूचे समर्थक मैदानात येऊन एकमेकांच्या खेळाडूंना डिवचण्याचे काम करत होते यावेळी पोलिसांना हुल्लडबाजी करणाऱ्यांना लाठीचा प्रसाद दिला..
अशा प्रकारच्या वादाच्या घटना कुठेतरी आपल्या खेळाची प्रतिमा खराब करत आहेत अशी चर्चा सुरू होती. हा वाद एवढ्या वर थांबला नाही सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात समर्थकांचे स्टेटस पडू लागले त्यामूळे कुठेतरी याला आळा बसणे गरजेचे आहे.
शेवटी प्रश्न हाच की हा वाद नक्की का झाला खेळाडू म्हणून तुम्ही मैदानात उतरता तेंव्हा तुम्हाला काही नियम असतात काही बंधने असतात. पण खेळाडूच नियमांचे पालन करत नाहीत सामना सूरू असताना एकमेकांच्या अंगावर धाऊन जाणे, समर्थकांना हातवारे करून डीवचने पंचांच्या अंगावर धाऊन जाणे, त्यांच्या निर्णयाला विरोध करणे या सर्व गोष्टींमुळे सामन्यांना गालबोट लागते. समर्थकांना जितकं चुकीचं धरले तितकेच खेळाडू देखील चुकीचे असतात. खेळाडू मैदानात खिलाडी वृत्ती दाखवत नाहीत. त्यामळे वाद जास्त होतात. के एस ए कडून याची गंभीर दखल घेऊन नक्कीच यावर योग्य ती कारवाई करावी. कोणाच्या दबावात येऊन निर्णय घेऊ नये आणि कोणाच्या दबावात येऊन निर्णय बदलू देखिल नये. जे ज्या शिक्षेस पात्र आहेत त्यांना ती मिळावी तरच हे वाद कमी होण्याची शक्यता आहे. अन्यथा येणाऱ्या काळात यापेक्षा ही वेगळे असे काहीतरी घडेल ज्याने कोल्हापूरचा फुटबॉल कायमस्वरूपी बंद होईल..?