कंपनीने कामावर बोलावल्यास कामावर जावे लागेल : कामगार आयुक्त अनिल गुरव

  कोल्हापूर प्रतिनिधी रविराज जगताप : लॉकडाऊननंतर कारखाने सुरू झालेल्या कालावधीत कंपनीने त्यांच्या संबंधित कामगारास कामावर बोलवले असता त्याला जावे लागेल, अशी माहिती कामगार आयुक्त प्रदीप गुरव यांनी दिली.

कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशन येथे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक संघटनांचे अध्यक्ष व श्री. गुरव यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत कामगारांच्या उपस्थितीविषयी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी इतर औद्योगिक संघटनांच्या अध्यक्षांनी त्यांच्यासमोर असणाऱ्या अडचणी, समस्या यावेळी मांडल्या.

Advertisements

आयआयएफचे विभागीय अध्यक्ष सुमित चौगुले यांनी सांगितले की, लॉकडाऊन कालावधीतील वीज बिलातील स्थिर आकार माफ करा, या प्रमुख मागणीबरोबर आमच्या इतर काही मागण्या आमदार जाधव यांच्यासमोर मांडल्या. त्याबाबतीत लवकरच समाधानकारक तोडगा काढू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, वीज बिलातील स्थिर आकार, कामगार कामावर येणे, त्यांना दुचाकीची अनुमती देणे, त्यांचे पगार अशा विविध मागण्यांसंदर्भात बैठकीत चर्चा झाली. काही उद्योगांना परवानगी मिळून आता काही उद्योग सुरू झाले असले तरी औद्योगिक वसाहती शेजारील गावातील कामगारांना कामावर येणे शक्य होत नाही, अशा उद्योगांसमोरील विविध संभम्रावस्था दूर करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील संबंधित घटकांची झूम अ‍ॅपच्या माध्यमातून लवकरच बैठक घेऊ. यामध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि उद्योजक असे सहभागी होऊन यातून सकारात्मक मार्ग काढू.

यावेळी गोशिमाचे अध्यक्ष सचिन शिरगावकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशनचे अतुल आरवाडे, मॅकचे गोरख माळी, स्मॅकचे अतुल पाटील, आयआयएफचे उपाध्यक्ष रवींद्र पाटील, संजय पाटील, सुरजित पवार, सतीश कडूकर, समीर पाटील, प्रसाद मंत्री, समीर परीख, भरत जाधव, विनय खोब्रे, शरद तोतला आणि अभिजित नाईक आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *