पार्सलमध्ये जर काही बेकायदेशीर नव्हते मग २० लाख का दिले….?

कोल्हापूर : नवोदीता घाटगे यांनी मलेशियाला पाठविलेल्या पार्सलमध्ये काही बेकायदेशीर नव्हते तर  हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांनी घाईघाईने २० लाख रूपये का दिले? अमली पदार्थ, बनावट पासपोर्ट, एटीएम कार्ड्स असल्याचे फोनवरून सांगून पत्नीची फसवणूक झाली असताना याबाबत नेहमी पत्रकार परिषदा घेणारे समरजित घाटगे आता गप्प का? असा सवाल राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत कोल्हापुरात प्रेस क्लबमध्ये त्यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषद घेवून हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. त्या म्हणाल्या, नवोदिता घाटगे यांनी मलेशियाला पाठवलेल्या पार्सलच्या आधारे २ ते ५ जूनच्या दरम्यान त्यांची २० लाख रूपयांची फसवणूक झाली आहे. ही मागणी झाल्यानंतर त्याक्षणी त्यांनी पोलिसात तक्रार द्यायला हवी होती. कोल्हापूर जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष असलेले त्यांचे पती समरजित घाटगे आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घरचे संबंध असतानाही अजूनही गुन्हेगारांच्या मुसक्या कशा आवळल्या नाहीत? ज्या बँक खात्यावर हे पैसे वर्ग झाले त्या बँक खात्यांचा शोध अद्याप का लागला नाही? अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली.               

यावेळी माधवी मोरबाळे, रेखा आवळे, पदमजा भालबर, जहिदा मुजावर, शहनाज अत्तार, पूजा साळोखे यांच्यासह महिला उपस्थित होत्या. याबाबत या अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनाही निवेदन दिले.

 

नक्की प्रकरण काय ?

 नवोदीतादेवी समरजितसिंहराजे घाटगे या आमच्या कागलच्या अस्मिता आहेत. आमच्या कागल राजघराण्याच्या सुनबाई म्हणून आमच्या राणीसाहेब  यांच्याविषयी आम्हाला आदरच आहे. दरम्यान; घाटगे यांची दि. दोन ते पाच जून २०२४ या काळात  २० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी आठ जून २०२४ रोजी कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. तशा बातम्याही नऊ जून, २०२४ रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये आल्या आहेत.           

नवोदीतादेवी समरजीतसिंह घाटगे यांनी मलेशियामध्ये पाठविलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ म्हणजेच ड्रग्स, बनावट पासपोर्ट आणि एटीएम कार्ड्स असल्याचे दूरध्वनी केल्यानंतर त्यांच्या खात्यावरून २० लाख रुपये वर्ग झाले आहेत. पोलिसात तक्रार दाखल करून पंधरा दिवस झाले. भाजपचे नेते असलेले समरजीतसिंह घाटगे त्यांच्या स्वतःच्या पत्नीलाच न्याय मिळवून देणार नसतील तर ते आम्हा जनतेला काय न्याय मिळवून देणार? फोनवरून २० लाख रुपयांची मागणी झाल्यानंतर त्यादिवशी, त्याक्षणीच पोलिसात तक्रार दाखल व्हायला हवी होती. परंतु; ती झाली नाही. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम आणि शंका निर्माण झालेल्या आहेत, त्याही दूर केल्या पाहिजेत.

 

आम्हा सर्वांची ही मागणी आहे की…..

१. या प्रकरणात मलेशियाचा संबंध असल्यामुळे एकूणच हा मामला आंतरराष्ट्रीय आहे.  या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एन. आय. ए. कडे द्या.

२. या प्रकरणामध्ये अमली पदार्थ म्हणजेच ड्रग्सचा समावेश असल्यामुळे हा तपास एन.सी. बी. (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) अर्थात राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडे द्या.  

३ घाटगे यांनी गुन्हा दाखल करून १५ दिवस झाले. ज्यांनी सीबीआयचे अधिकारी आणि कस्टम अधिकारी म्हणून त्यांना फोन केले. त्या दोन खात्यांवर आरटीजीएसद्वारे २० लाख रुपये वर्ग केले.  त्या बँक खात्यांवरून त्या दोघांच्या मुसक्या अद्यापही का आवळल्या नाहीत ?       

४. ज्या बँक  खात्यांवर ही २० लाखाची रक्कम वर्ग केलेली आहे त्या बँक खात्यांचा शोध अद्याप का लागला नाही.?

५. परदेशात पाठवलेल्या त्या पार्सलचे पुढे काय झाले?  म्हणजे ते ज्या ठिकाणी पाठवायचे होते तिथे ते पोहोचले की नाही? सध्या ते पार्सल नेमकं कुठे आहे?     

६. परदेशात पाठविलेल्या त्या पार्सलमध्ये जर काही आक्षेपार्ह आणि बेकायदेशीर नसेलच तर मग ते मिटविण्यासाठी तब्बल २० लाख रुपये द्यायची काय गरज होती? याचाही खुलासा झालाच पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *