भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करा-सहायक आयुक्त सचिन साळे

कोल्हापूर, दि. 19 : कोल्हापूर महानगरपालिका व महानगरपालिका हद्दीपासून ५ कि.मी. परिसरात असणाऱ्या सर्व महाविद्यालयांनी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील आपल्या महाविद्यालयात शिकत असणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबतची माहिती द्यावी. विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यापासून ३० दिवसाच्या आत प्रथम वर्षा करीता अर्ज परिपूर्ण कागदपत्रासह सादर करावेत. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी तात्काळ संबंधित शैक्षणिक संस्थेमार्फत अर्ज भरावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे  सहायक आयुक्त, सचिन साळे यांनी केले आहे.

शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या शासकीय प्रवेश न घेतलेल्या अनु. जाती तथा नवबौध्द घटकातील इयत्ता ११ वी, १२ वी तसेच इ.१२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये नियमित प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे, म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा शैक्षणिक संस्थेमार्फत उपलब्ध होत नसल्याने त्या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे. या करीता एकुण ४३ हजार रुपये अनुदान १० महिन्याकरीता देय असून ते दोन टप्यामध्ये अदा करण्यात येईल. यामध्ये वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष २ हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल.

Advertisements

या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष पुढीलप्रमाणे- विद्यार्थी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गाचा असावा. व तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तसेच विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा. विद्यार्थ्यांच्या पालकाचे गतवर्षीचे (सन २०२३-२४) वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारापेक्षा जास्त नसावे. या योजनेंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्द व महानगरपालिकेच्या हद्दीपासून ५ कि.मी.च्या परिसरात असलेल्या महाविद्यालय/शैक्षणिक संस्था या ठिकाणी प्रवेशित असणाऱ्या व भाड्याने राहत असणाऱ्या (कुटुंबापासून स्वतंत्र) विद्यार्थ्यांसाठी या योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे.  विद्यार्थ्यास इयत्ता १० वी व १२ वी मध्ये किमान ५० टक्के व दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांची महाविद्यालयामधील उपस्थिती किमान ७५ टक्के आवश्यक राहील. या लाभास पात्र असलेला विद्यार्थी हा भारत सरकार शिष्यवृत्ती करीता पात्र असावा.

*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *