कोल्हापूर: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या झोळीत तिसरे पदक आले आहे. कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने इतिहास रचला आहे. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत मराठमोळ्या स्वप्नीलने कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमधील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात प्रथमच भारतीय नेमबाजाने पदक जिंकले आहे. चालू ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक होते. याआधी भारताची शेवटची दोन पदके नेमबाजीतही आली होती.
स्वप्नीलने ५० मीटर रायफल स्पर्धेत चमकदार कामगिरी करत एकूण ४५१.४ इतका स्कोअर केला. चीनचा लिऊ युकुन अव्वल स्थानावर राहिला. त्याचा स्कोर ४६३.६ होता. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने दुसरा क्रमांक पटकावला.स्वप्नील कुसळेने डावाची संथ सुरुवात केली. त्याने १५३.३ (पहिली सीरीज- ५०.८, दुसरी सीरीज- ५०.९, तिसरी सीरीज- ५१.६) स्कोअर केला. तो सहाव्या क्रमांकावर राहिला. यानंतर, त्याने प्रोनमध्ये (पहिली सीरीज- ५२.७, दुसरी सीरीज- ५२.३, तिसरी सीरीज- ५१.९) १५६.८ गुण मिळवून आपली स्थिती सुधारली
स्वप्नील कुसळेने पहिल्या सीरीजमध्ये ५१.१ आणि दुसऱ्या सीरीजमध्ये ५०.४ म्हणजेच एकूण १०१.५ गुण मिळवले. म्हणजेच त्याचा एकूण स्कोअर ४२२.१ होता आणि तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला. इथून पुढे आव्हान आणखी गंभीर होते. पण इथून पुढे स्वप्नील कुसळेने मागे वळून पाहिले नाही. एलिमिनेशनमध्ये त्याने शानदार पद्धतीने कांस्यपदक पटकावले.