कोल्हापूर, प्रतिनिधी/ काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत आम्ही त्यांचे स्वागत करतो. मात्र राहुल गांधी यांनी जनतेच्या मनातील काही प्रश्नांना उत्तरे द्यावीत, असे आम्ही आवाहन करतो. खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज समस्त हिंदू समाजासाठी दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे खासदार राहुल गांधी अनावरण करणार आहेत. त्यापूर्वी गांधी यांनी पुढील प्रश्नांबाबत आपली आणि काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करावी.
हिंदू धर्माची आणि हिंदू संस्कृतीची निंदा नालस्ती आणि टिंगल करणाऱ्या, तसेच देशाचे तुकडे तुकडे करणाऱ्या गॅंग साठी राहुल गांधी आदर्श आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी आणि हिंदू धर्म रक्षणासाठी औरंगजेब, आदिलशाही, मोगलशाही यासारख्या हिंदू धर्मावर चालून आलेल्या आक्रमकांना धडा शिकवला. राहुल गांधी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पराक्रम माहित आहे का..? स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवरायांनी केलेले कार्य राहुल गांधी यांना लक्षात आहे का..? पुरोगामीत्वाच्या नावाखाली, हिंदू धर्माची कुचेष्टा आणि अवमान होऊ देणार नाही, असे राहुल गांधी मान्य करतात का ? कारण कोल्हापूरची स्वाभिमानी जनता राजकारणासाठी धर्माचा वापर करणाऱ्यांना कधीच थारा देत नाही, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते.
अयोध्येत श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात नाच गाणी करण्यात आली, असा तद्दन घाणेरडा आणि खोटा आरोप राहुल गांधी यांनी एका प्रचार सभेत बोलताना केला होता. त्याबद्दल राहुल गांधी समस्त हिंदू समाजाची जाहीर माफी मागण्यास तयार आहेत का ? तसेच लोकसभेत बोलताना खासदार राहुल गांधी यांनी, हिंदू म्हणजे असत्य, हिंदू म्हणजे हिंसा अशी विधाने केली होती. हिंदू धर्माचा इतका द्वेष करणाऱ्या राहुल गांधी यांना, हिंदू समाजाचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण करण्याची खरोखर इच्छा आहे का ? की केवळ राजकारणासाठी राहुल गांधी ढोंग करत आहेत, याचा खुलासाही करण्यात यावा.
काँग्रेसच्या काही उथळ नेत्यांनी श्री स्वामी समर्थांचा अवमान करणारे वक्तव्य केले होते. त्याबद्दल राहुल गांधी आपल्या पक्षाच्या खासदारांना आणि माजी मंत्री असणाऱ्या आमदारांना माफी मागायला लावणार आहेत का, असा माझा तमाम स्वामी भक्तांच्या वतीने त्यांना प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर विशिष्ट समाजाचे अतिक्रमण झाले होते. केवळ मतांसाठी गड किल्ल्यावरील अतिक्रमण पाडण्यास विरोध करून, महाराजांचा अपमान करणाऱ्या आपल्या पक्षाचे खासदार आणि माजी मंत्री असणाऱ्या आमदारांना, राहुल गांधी माफी मागायला लावतील का, असा तमाम शिवभक्तांच्या वतीने माझा प्रश्न आहे. खासदार राहुल गांधी यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत, आपली भूमिका स्पष्ट करावी. तरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा त्यांना नैतिक अधिकार असेल. कोल्हापुरात येणाऱ्या राहुल गांधी यांनी हे आव्हान स्वीकारावे आणि कोल्हापूरकरांसह तमाम हिंदूनिष्ठ नागरिकांच्या मनातील प्रश्नांबाबत आपली खरी भूमिका मांडावी, अशी मी विनंती करत आहे.